ऋषभ शेट्टी

‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टी यांचा संघर्षमय प्रवास जाणून घ्या. ऑफिस बॉय, ड्रायव्हर म्हणून काम करण्यापासून अभिनेता-दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास.

‘कांतारा’ या चित्रपटामुळे अभिनेता आणि निर्माता म्हणून देशभरात प्रसिद्धी मिळवलेले ऋषभ शेट्टी यांना हे यश सहजासहजी मिळालेले नाही. चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यापूर्वी त्यांच्या वाट्याला संघर्षाचे अनेक कठीण टप्पे आले. नुकत्याच एका मुलाखतीत ऋषभ यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाची कहाणी सांगितली.

कर्नाटकातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या ऋषभ शेट्टी यांचे खरे नाव प्रशांत शेट्टी आहे. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून ऋषभ शेट्टी असे केले.

ऋषभ शेट्टी

गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी बंगळुरूला आले. मात्र, अभिनयाची आवड असल्याने पदवीच्या दुसऱ्याच वर्षापासून त्यांनी स्थानिक लोकनाट्यांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बंगळुरू येथील सरकारी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून चित्रपट दिग्दर्शनाचा डिप्लोमा केला.

बंगळुरूमध्ये शिक्षण घेत असताना आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण होती. खर्च भागवण्यासाठी ऋषभ यांनी घराघरांत जाऊन मिनरल वॉटर आणि चहापत्ती विकण्याचे काम केले. त्याचबरोबर हॉटेल आणि प्रॉपर्टी व्यवसायाशी संबंधित छोटी-मोठी कामेही त्यांनी केली.

दिग्दर्शनाचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र, सुरुवातीची अनेक वर्षे त्यांना केवळ स्पॉट बॉय, क्लॅप बॉय यांसारखी छोटी कामेच मिळत होती. अभिनयाची संधी मिळावी म्हणून ते अनेक ऑडिशन देत होते; मात्र जवळपास प्रत्येक ऑडिशनमध्ये त्यांना नकाराचा सामना करावा लागला.

हेदेखील वाचा: ‘लव्ह इन टोकियो’-1966 ची भन्नाट कहाणी; जय-आशाची जोडी, टोकियोचे सौंदर्य आणि आजही लोकप्रिय गाणी

चांगल्या करिअरच्या शोधात ऋषभ २००८ मध्ये मुंबईत आले. मात्र, मायानगरीत संघर्ष आणखी कठीण होता. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मुंबईतील सुरुवातीच्या काळात त्यांनी अंधेरीतील एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम केले. चित्रपटसृष्टीशी जोडलेले राहण्यासाठी त्यांनी एका निर्मात्याकडे चक्क ड्रायव्हरची नोकरीही केली.

आर्थिक परिस्थिती इतकी बिकट होती की, अनेकदा पोट भरण्यासाठी त्यांना केवळ वडापाववर दिवस काढावा लागायचा. मात्र, या परिस्थितीने त्यांनी हार मानली नाही. अभिनय आणि दिग्दर्शनाचे स्वप्न त्यांनी कायम जपले.

ऋषभ शेट्टी

२०१२ मध्ये ऋषभ यांना पहिल्यांदा ‘तुगलक’ या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०१६ पर्यंत त्यांनी विविध छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. याच काळात त्यांनी ‘रिकी’ या कन्नड चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

यानंतर आलेल्या ‘किरिक पार्टी’ या चित्रपटाने ऋषभ यांच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी दिली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यांच्या कामाची दखल घेत २०१८ मध्ये त्यांना ‘सर्वोत्कृष्ट बालचित्रपट’ या श्रेणीतील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

मात्र, अभिनेता म्हणून मोठी संधी मिळण्यासाठी त्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागली. अखेर २०१९ मध्ये ‘बेल-बॉटम’ या चित्रपटातून त्यांना प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

घराघरांत जाऊन वस्तू विकण्यापासून ते ऑफिस बॉय आणि ड्रायव्हर म्हणून काम करण्यापर्यंतचा प्रवास, त्यानंतर अभिनेता-दिग्दर्शक म्हणून मिळवलेले यश—ऋषभ शेट्टी यांची ही संघर्षकथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *