जन्माष्टमी स्पेशल

जन्माष्टमीच्या निमित्ताने ऐका श्रीकृष्णाच्या लीलांवर आधारित लोकप्रिय हिंदी चित्रपटगीते आणि भक्तिगीते. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्या अजरामर कृष्णगीतांसह गोविंदा, राधा-कृष्ण आणि भक्तिगीतांचा सुरेल मागोवा.

जन्माष्टमीचा सण जवळ आला की वातावरणात आपोआपच कृष्णभक्तीचे रंग भरू लागतात. मंदिरांपासून घराघरांपर्यंत श्रीकृष्णाच्या लीलांचे वर्णन करणारी भजने आणि गीते कानावर पडू लागतात. हिंदी चित्रपटसृष्टीनेही श्रीकृष्णाच्या बाललीला, राधा-कृष्णाचे प्रेम, गोप-गोपींचे भावविश्व आणि गोविंदाच्या खोडकर लीलांना गीतांच्या माध्यमातून सुरेल अभिव्यक्ती दिली आहे. यातील अनेक गीते काळाच्या पडद्याआड न जाता आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. जन्माष्टमीच्या निमित्ताने अशाच काही लोकप्रिय कृष्णगीतांचा हा सुरेल मागोवा…

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळापासूनच भक्तिसंगीत आणि चित्रपट यांचे अतूट नाते राहिले आहे. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीवर तसेच त्यांच्या बालपणापासून किशोरवयापर्यंतच्या विविध लीलांवर आधारित असंख्य गीते चित्रपटांतून रसिकांसमोर आली. काही गीते तर इतकी लोकप्रिय झाली की त्यांनी चित्रपटाच्या चौकटीपलीकडे जाऊन मंदिरांमध्ये, पूजा-स्थळी आणि धार्मिक उत्सवांमध्येही स्थान मिळवले.

जन्माष्टमी स्पेशल

लता मंगेशकरांच्या स्वरांनी अजरामर झालेली कृष्णगीते

श्रीकृष्णावर आधारित अनेक सुमधुर गीतांना लता मंगेशकर यांच्या मधुर स्वरांनी अविस्मरणीय उंची मिळवून दिली. त्यांचा स्वर कानावर पडताच कृष्णाच्या बाललीला, यशोदेचे वात्सल्य आणि राधेची भक्ती डोळ्यांसमोर उभी राहते. १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अमर प्रेम’ चित्रपटातील ‘बड़ा नटखट है रे कृष्ण कन्हैया, का करे यशोदा मैया’ हे गीत आनंद बक्षी यांच्या लेखणीतून साकारले. यशोदेच्या कुशीतल्या खोडकर बाळात बालकृष्णाचे रूप पाहणाऱ्या प्रत्येक आईच्या भावविश्वाशी हे गीत सहज जोडले जाते. त्यामुळे या गीताला जणू अंगाईगीताचीच गोडी लाभली आहे. १९७८ मधील ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटातील ‘यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला’ हे गीत बालकृष्णाच्या निरागस प्रश्नांचे आणि खोडकर स्वभावाचे सुंदर चित्रण करते. आई यशोदेकडे लाडिक तक्रार करणारा नंदलाल या गीतातून जणू साक्षात आपल्या समोर उभा राहतो. १९८९ मधील ‘संतोष’ चित्रपटातील ‘बंसी वाले ने घेर लई, अकेली जो पनिया भरन मैं गई’ हे लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत ब्रज प्रदेशासह देशभर लोकप्रिय झाले. त्याचप्रमाणे ‘शागिर्द’ (१९६७) मधील ‘कान्हा आन पड़ी मैं तेरे द्वार’ आणि ‘जॉनी मेरा नाम’ (१९७०) मधील ‘मोसे मोरा श्याम रूठा… छुप छुप मीरा रोए’ यांसारख्या गीतांतून कृष्णभक्तीची विविध रूपे प्रभावीपणे व्यक्त झाली.

हेदेखील वाचा: लावणीच्या (lavani) नावाखाली काय चाललंय? पारंपरिक लावणी आणि ‘डीजे लावणी’तील फरक समजून घेण्याची वेळ; बंदी नव्हे, तर कलेची अभिरुची जपण्याची गरज

भक्तिभावाने ओथंबलेली कृष्णगीते

हिंदी चित्रपटांतील कृष्णभक्तीची भजनेही रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवून आहेत. १९५२ मधील ‘बैजू बावरा’ चित्रपटात मोहम्मद रफी यांनी गायलेले ‘मन तड़पत हरि दर्शन को आज’ हे गीत भक्ताच्या ईश्वरदर्शनाच्या उत्कट आसक्तीचे दर्शन घडवते. धीरगंभीर स्वर आणि भावपूर्ण शब्दांमुळे हे गीत आजही श्रोत्यांना अंतर्मुख करते. १९५७ मधील ‘मिस मेरी’ चित्रपटातील ‘वृंदावन का कृष्ण कन्हैया सबकी आंखों का तारा’ हे गीतही जन्माष्टमीच्या काळात आवर्जून ऐकले जाते. वृंदावनातील कृष्ण आणि राधिकेचे भावविश्व या गीतातून सुंदरपणे उलगडते. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील ‘खानदान’ (१९६५) चित्रपटातील ‘बड़ी देर भई नंदलाला, तेरी राह तके बृजवाला’ हे गीत कृष्णभक्तीपर गीतांच्या यादीतील एक अविस्मरणीय रत्न आहे. नंदलालाच्या प्रतीक्षेत असलेले ब्रजवासी, ग्वाल-बाल आणि मुरलीवाल्याची ओढ या गीतातून प्रभावीपणे व्यक्त होते.

जन्माष्टमी स्पेशल

‘गोविंदा आला रे’ म्हणत उत्साहाची उधळण

कृष्ण कन्हैयाच्या गीतांचा विषय निघाला की मटकी, दहीहंडी आणि गोविंदाचा उत्साह कसा विसरता येईल? कृष्णाच्या खोडकर लीलांवर आधारित काही गीते तर उत्सवांचा अविभाज्य भाग बनली आहेत. ‘बदला’ (१९७४) चित्रपटातील किशोर कुमार यांच्या आवाजातील ‘शोर मच गया शोर, देखो आया माखन चोर’ आणि ‘खुद्दार’ (१९८२) मधील ‘मच गया शोर सारी नगरी रे, आया बिरज का बांका संभाल तेरी गगरी रे’ ही गीते ऐकली की वातावरणात आपोआपच उत्साह संचारतो. कृष्णाच्या माखनचोरीपासून गोपिकांच्या गमती-जमतींपर्यंतच्या लीलांचे रंग या गीतांत खुलतात. त्याच धर्तीवर ‘ब्लफ मास्टर’ (१९६३) मधील ‘गोविंदा आला रे आला’, ‘ओह माय गॉड’ (२०१२) मधील ‘गो गो गो गोविंदा’ आणि ‘किसना : द वॉरियर पोएट’ (२००५) मधील ‘वो किसना है’ ही गीतेही रसिकांच्या विशेष पसंतीस उतरली. दहीहंडी, जन्माष्टमी आणि इतर उत्सवांच्या जल्लोषात आजही ही गीते वातावरणाला वेगळीच रंगत आणतात.

राधा-कृष्णाच्या प्रेमभावनेची गोडी

कृष्णाच्या लीलांबरोबरच राधा-कृष्णाचे नाते हिंदी चित्रपटगीतांचा महत्त्वाचा विषय राहिले आहे. १९७५ मधील ‘गीत गाता चल’ चित्रपटातील आरती मुखर्जी आणि जसपाल सिंह यांच्या आवाजातील ‘श्याम तेरी बंसी पुकारे राधा नाम’ हे गीत राधेच्या कृष्णावरील प्रेमाची आणि बासरीच्या सुरांची भावमधुर अनुभूती देते. यानंतर ‘हम साथ साथ हैं’ (१९९९) मधील ‘मैया यशोदा ये तेरा कन्हैया’ आणि ‘लगान’ (२००१) मधील ‘राधा कैसे न जले’ या गीतांनीही नव्या पिढीपर्यंत राधा-कृष्णाचे भावविश्व पोहोचवले. काळ बदलला, संगीताची शैली बदलली; मात्र या गीतांची लोकप्रियता कायम राहिली.

जन्माष्टमी स्पेशल

चित्रपटांपलीकडेही कृष्णभक्तीचा सुरेल प्रवाह

श्रीकृष्णावर आधारित भक्तिगीतांची लोकप्रियता केवळ हिंदी चित्रपटांपुरती मर्यादित राहिलेली नाही. भजनगायक, लोकगायक आणि भक्तिसंगीताच्या परंपरेनेही कृष्णभक्तीचा हा सुरेल वारसा समृद्ध केला आहे. ‘अरे द्वारपालों कन्हैया से कह दो’, ‘छोटी-छोटी गैया, छोटे-छोटे ग्वाल’, ‘हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की’, ‘अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम’ आणि ‘राधे राधे जपो, चले आएंगे बिहारी’ यांसारखी भजने आजही घराघरांत, मंदिरांमध्ये आणि धार्मिक कार्यक्रमांत भक्तिभावाने गायली जातात. जन्माष्टमीच्या रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा होताना घंटानाद, शंखध्वनी, टाळ-मृदंग आणि या कृष्णगीतांचे सूर एकत्र मिसळतात.

त्या क्षणी संगीत केवळ मनोरंजन राहत नाही; ते भक्ती, श्रद्धा आणि भावनेचे माध्यम बनते. म्हणूनच कृष्णगीते ही केवळ हिंदी चित्रपटसृष्टीची देणगी नाही, तर पिढ्यान्‌पिढ्या जपली गेलेली एक सुरेल भक्तिपरंपरा आहे. कान्हाच्या खोडकर लीलांपासून राधेच्या प्रेमभावनेपर्यंत आणि गोविंदाच्या जल्लोषापासून भक्ताच्या हरिदर्शनाच्या आर्ततेपर्यंत—कृष्णगीते प्रत्येक भावनेला स्वर देतात. जन्माष्टमी आली की हे सूर पुन्हा एकदा वातावरणात घुमतात आणि प्रत्येकाच्या मनातला ‘कान्हा’ जागा करतात.

-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि.सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *