जत तालुक्यातील राजारामबापू साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवर रातोरात ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असे नाव लावल्याने राजकीय वातावरण तापले. गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात संघर्ष तीव्र.
(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
जत : जतजवळील तिप्पेहळ्ळी येथील राजारामबापू साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवर रातोरात ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असे नाव लिहिल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या नावबदलामागचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी, राजकीय पार्श्वभूमीवर हा प्रकार पाहिला जात असून आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्या संघर्षाला यामुळे नवे वळण मिळाले आहे.

पार्श्वभूमी: डफळे साखर कारखान्याची घसरण आणि लिलाव
जत तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू मानला जाणारा राजे विजयसिंह डफळे शेतकरी सहकारी साखर कारखाना हा एकेकाळी शेतकऱ्यांच्या त्याग, श्रम आणि स्वप्नांवर उभा राहिलेला प्रकल्प होता. मात्र, तत्कालीन संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे हा कारखाना आर्थिक संकटात सापडला. राज्य सहकारी बँक आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मोठे कर्ज बाकी राहिल्याने कारखाना दिवाळखोरीत निघाला.
राज्य सरकारने प्रशासक नेमल्याने कारखान्याचे व्यवस्थापन अधिकच गुंतागुंतीचे झाले. याच काळात कर्नाटकातील एका खासगी साखर कारखान्याने हा प्रकल्प भाडेतत्त्वावर चालविण्याची तयारी दर्शविली होती, मात्र कथित कमिशन न मिळाल्याने तो करार रद्द झाला. त्यानंतर कारखान्याचे सर्व व्यवहार ठप्प झाले आणि अखेर राज्य सहकारी बँकेने हा कारखाना थकीत कर्जापोटी लिलावात काढला.
राजारामबापू कारखान्याची खरेदी आणि पुनरुज्जीवन
या लिलाव प्रक्रियेत माजी मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजारामबापू साखर कारखान्याने कायदेशीर मार्गाने हा जतचा बंद कारखाना विकत घेतला. बेंगलोर येथून कोट्यवधी रुपयांची नवी यंत्रसामग्री आणून कारखाना पुन्हा सुरू करण्यात आला. त्यानंतर या कारखान्याचे नाव बदलून ‘राजारामबापू साखर कारखाना युनिट क्रमांक ४’ असे करण्यात आले.
या प्रक्रियेमुळे मूळ बावीस हजार सभासदांच्या हक्कावर गदा आली.जे सभासद आपल्या घरातील दागदागिने, पशुधन, धान्य विकून या कारखान्याचे सदस्य झाले होते, त्यांना कारखान्याच्या व्यवस्थापनातून बाजूला केले गेले. या निर्णयामुळे दीर्घकाळ शेतकऱ्यांच्या मनात असंतोष वाढत गेला.
पडळकर यांचा आक्रमक पवित्रा
अलीकडेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन जयंत पाटील यांनी हा कारखाना मूळ सभासदांना परत द्यावा, अशी मागणी केली. त्यांनी ‘रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढू,’ असा इशाराही दिला. तसेच, ‘कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही,’ अशी स्पष्ट चेतावणी देत त्यांनी आंदोलनाचा सूर लावला.
त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते सुरेश शिंदे यांनी प्रत्युत्तर देत ‘कारखाना बंद करून दाखवा’ असे आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, ‘शेतकऱ्यांच्या अन्नात माती कळवू नका. आटपाडी परिसरातील कारखाने का बंद पडले, हे आधी स्पष्ट करा.’ या वादामुळे पडळकर आणि जयंत पाटील गटांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

नावबदल प्रकरण: संघर्षाचा नवा टप्पा
या तणावाच्या पार्श्वभूमीवर रातोरात राजारामबापू साखर कारखान्याच्या स्वागत कमानीवरचे नाव काढून टाकून ‘राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना’ असे नाव लावण्यात आले. या प्रकारामुळे जत तालुक्यासह सांगली जिल्हाभर राजकीय वातावरण तापले आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची नोंद घेत तपास सुरू केल्याचे कळते.
आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी
या प्रकरणाला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि जत नगरपरिषद निवडणुकांपूर्वीचे राजकीय समीकरण मानले जात आहे. पडळकर यांनी बिळूर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ‘जतचा डफळे कारखाना परत मिळविण्यासाठी तयार आहात का?’ असा प्रश्न विचारत उपस्थितांकडून अनुमोदन मिळविले. यानंतरच रातोरात नावबदलाची घटना घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला अधिकच उधाण आले आहे.
पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष
साखर उद्योगाशी निगडित हा प्रश्न केवळ आर्थिक नसून स्थानिक शेतकऱ्यांच्या अस्मितेचा आणि हक्कांचा प्रश्न बनला आहे. या नावबदलामुळे पडळकर–पाटील संघर्षाला नव्या आगीचा फुंकर बसला असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
