मिरज, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
डिजिटल युगात मोबाईलच्या स्क्रोलस्क्रोल खेळात अडकलेल्या आजच्या पिढीला पुस्तकांकडे वळवणं हे आव्हानच ठरत आहे. मात्र, मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील ६५ वर्षीय ग्रंथपाल भूपाल संकपाळ यांनी हे आव्हान स्वीकारत एक वेगळी चळवळ उभी केली आहे — फिरते वाचनालय. त्यांच्या दुचाकीवर पुस्तकांच्या कपाटासह वाचनाची मशाल घेऊन ते रोज गावोगावी फिरतात आणि ‘वाचन चळवळ’ घराघरांत पोहोचवतात.
ज्ञानाचा दिवा पेटलेला…
सावळवाडीतील ज्ञानविकास सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून ‘वाचन उपक्रम’ सुरू करण्यात आला आहे. ‘पुस्तकाचे आत्मवृत्त’ या संकल्पनेतून घराघरांत पुस्तक पोहोचवले जात आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत संकपाळ सावळवाडी, माळवाडी आणि दूधगाव या गावांमध्ये स्वतःच्या दुचाकीवरून फिरून वाचकांना मासिके, साप्ताहिके, वृत्तपत्रे, आणि विविध प्रकारची पुस्तके मोफत वाचण्यासाठी देतात.
पुस्तक ‘डिलिव्हरी’ ऑन व्हील्स!
त्यांनी स्वतःच्या दुचाकीवर एक खास कपाट तयार करून त्यात पुस्तके ठेवण्यासाठी जागा केली आहे. याशिवाय, छोटा स्पीकर व स्वतंत्र बॅटरी बसवून ‘वाचाल तर वाचाल’, ‘पुस्तके वाचा, ज्ञान वाढवा’ असे घोषवाक्य गावागावात घुमवत, वाचनाचे महत्व पटवतात. ‘संवादिनी’ नावाच्या ऑडिओमुळे लांबूनच वाचकांना ‘वाचनालय आले’ हे समजते.
शाळांमध्येही वाचनप्रेम
या उपक्रमाचा उद्देश फक्त प्रौढांपुरता मर्यादित नसून जिल्हा परिषद व खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. सुटीच्या दिवशी ग्रंथ प्रदर्शन भरवले जाते. पुस्तक वाचल्यानंतर दुसरे पुस्तक लगेच मिळते, यामुळे वाचनात सातत्य टिकते. वाचन करणाऱ्या मुलांना लहान भेटवस्तूही दिल्या जातात, त्यामुळे मुलांमध्ये उत्साह दिसतो.
सभासदसंख्या आणि पाठिंबा
सध्या गावातील १०० व बाहेरील १०० सभासद, असे मिळून २०० जण संकपाळ यांच्या वाचन चळवळीचा भाग आहेत. फक्त २५ रुपयांत सभासदत्व आणि घरपोच पुस्तक सेवा ही सुविधा अनेकांना आकर्षित करत आहे. या कामात त्यांना वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष निरवाणे, सचिव विजय निरवाणे, तसेच बाळासाहेब आवटी, हेमकांत पाटील, श्रेणीक पाटील यांसारख्या अनेक सहकाऱ्यांचा सक्रिय पाठिंबा लाभतो आहे.
राजकीय व प्रशासकीय पातळीवरही कौतुक
या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती सांगली दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी संकपाळ यांचे थेट कौतुक करून अभिनंदन केले.
वाचनसंस्कृती जपणारा एक सच्चा “ज्ञानयोद्धा” म्हणून भूपाल संकपाळ यांचे काम संपूर्ण राज्यासाठी आदर्श ठरत आहे. डिजिटल गॅझेट्सच्या जाळ्यात अडकलेल्या समाजाला पुन्हा पुस्तकांच्या गंधाकडे वळवणारी ही चळवळ म्हणजे खरंच “सावळवाडीची साक्षात ज्ञानगंगा!”