जत तालुक्यातील ठळक घटना: तालुक्यातील साळमाळगेवाडीत गळफास घेऊन आत्महत्या; तालुक्यातील एका गावात बालविवाहाची घटना – तणावाचे वातावरण; माडग्याळला आगीत दुकान खाक
साळमाळगेवाडीत गळफास घेऊन आत्महत्या
जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
जत तालुक्यातील साळमाळगेवाडी येथे पप्पासो ऊर्फ बाबासो लक्ष्मण भिसे (वय ४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. १६) दुपारी २.३० च्या पूर्वी घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु मायक्रो फायनान्सच्या कर्जामुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.
हे देखील वाचा: health benefits: पिस्ता खाण्याचे महत्त्वाचे आरोग्यदायी 8 फायदे जाणून घ्या
घटनेचा तपशील
पप्पासो भिसे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती कुटुंबीयांना मिळताच, त्यांच्या भावाने—आप्पासो भिसे—त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर शशी वाली यांनी या घटनेची माहिती पोलिस ठाण्यास दिली.
पोलीस तपास सुरू
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, पोलिस विविध अंगाने तपास करत आहेत.

जत तालुक्यात बालविवाह; गावात तणावाचे वातावरण
जत तालुक्यातील एका गावात बालविवाह झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतची तक्रार जिल्हा चाईल्ड लाईनकडे दाखल होताच, तातडीने पथकाने गावात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मुलीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसपाटील आणि पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता.
हे देखील वाचा: shocking! मुख्याध्यापिकेच्या मुलीचा साखरपुडा; शिक्षकाविना जिल्हा परिषदेची शाळा!
घटनेचा तपशील: संबंधित गावात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह ३५ वर्षीय पुरुषासोबत नियोजित होता. ही दोघेही कर्नाटक राज्यातील असून, पीडित मुलगी शिक्षणासाठी जत तालुक्यात राहत होती. नियोजित वेळेनुसार सायंकाळी विवाह पार पडला. या घटनेची माहिती चाईल्ड लाईन संस्थेला मिळताच, त्यांच्या पथकाने तातडीने कारवाई केली. मात्र, तोपर्यंत वधू-वरांना अन्यत्र हलवण्यात आले होते. विवाह प्रतिबंध अधिकारी आणि पोलिसांच्या उपस्थितीमुळे काही काळ गावात तणाव निर्माण झाला होता.
जिल्ह्यातील बालविवाहाचे वाढते प्रमाण
सांगली जिल्ह्यात वर्षारंभापासून आतापर्यंत एकूण आठ बालविवाहाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तथापि, अद्याप कोणत्याही प्रकरणात अधिकृत गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. बालविवाह रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी नुकतीच शपथ घेतली असली तरी, प्रत्यक्षात अशा घटना घडत असल्याचे समोर येत आहे. विशेषतः मिरज आणि जत तालुक्यात बालविवाहांचे प्रमाण जास्त असल्याने प्रशासनाने या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
पालकमंत्र्यांकडून कठोर निर्देशांची शक्यता
येत्या १७ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली दौऱ्यावर येणार आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, ते बालविवाह प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेऊन संबंधित विभागास कठोर निर्देश देण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या प्रकरणांची गंभीर दखल घेतली नाही, तर भविष्यात अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
माडग्याळला आगीत दुकान खाक
तालुक्यातील माडग्याळ येथे वखार भाग परिसरात असणाऱ्या स्टेशनरी दुकानास आग लागून सर्व साहित्य जळून खाक झाले. ही आग शनिवारी दुपारी चारच्या दरम्यान लागली. यामध्ये ९० हजार रुपयाचें नुकसान झाल्याचे स्टेशनरीचे मालक रूपसेन बोगार यांनी सांगितले. रूपसेन दिव्यांग आहेत. त्यांचे येथे स्टेशनरीचे दुकान आहे. ते दुकान बंद करून यात्रेसाठी बिळूर येथे स्टेशनरीचे काही साहित्य विक्रीसाठी घेऊन गेले होते.
त्यांची पत्नी मजुरीसाठी गेल्या होत्या. शनिवारी दुपारी चार वाजता स्टेशनरी दुकानातून धूर निघू लागला व आतील स्टेशनरी साहित्याला आग लागली.