सारांश: तासगाव तालुक्यातील बस्तवडे शाळेत मुख्याध्यापिकेच्या मुलीचा साखरपुडा असल्याने सर्व शिक्षक गैरहजर राहिले, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकाविना शाळेत बसावे लागले. अधिक धक्कादायक म्हणजे, एका खासगी व्यक्तीने शाळा उघडली आणि व्यवस्थापन केले. पालकांनी संताप व्यक्त करत शिक्षणाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली आहे. या प्रकारामुळे नाराज पालकांनी सोमवारपासून मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
तासगाव, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
तासगाव तालुक्यातील बस्तवडे येथील जिल्हा परिषद शाळेत शनिवारी शिक्षकाविना शाळा भरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुख्याध्यापिकेच्या मुलीचा साखरपुडा असल्याने संपूर्ण शिक्षकवृंद समारंभासाठी रवाना झाल्याने विद्यार्थ्यांना एकटेच शाळेत वेळ घालवावा लागला. या प्रकारामुळे पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
गुरुजींचा साखरपुडा अन् रिकामी शाळा!
शनिवारी सकाळच्या सत्रात नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत हजर झाले, मात्र शिक्षकांचा मागमूस नव्हता. काही चौकस पालकांनी या प्रकाराची माहिती घेत असता मुख्याध्यापिकेच्या मुलीचा साखरपुडा असल्याने त्या शाळेत गैरहजर होत्या. त्याचबरोबर इतर दोन शिक्षकही समारंभासाठी गेल्याचे समजले. तिसरे शिक्षकदेखील शाळेत उपस्थित नव्हते, मात्र पालकांनी गोंधळ घातल्याने ते उशिराने शाळेत पोहोचले.
शाळा चालवणारा खासगी शिक्षक!
याहून धक्कादायक बाब म्हणजे, शिक्षक नसताना एका खासगी व्यक्तीच्या भरवशावर शाळा चालवल्याचे उघड झाले. या व्यक्तीने शाळेचे दरवाजे उघडले आणि विद्यार्थी येऊ दिले. मात्र, नियमित शिक्षणाऐवजी विद्यार्थ्यांना कोणतीही शैक्षणिक प्रक्रिया न घडता वेळ घालवावा लागला.
पालकांचा संताप; शिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी सुरू
शाळेतील या प्रकाराची माहिती मिळताच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अमोल पाटील यांनी शाळेत धाव घेतली. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड यांनीही तातडीने शाळेची पाहणी करून चौकशी केली. तीनही शिक्षकांचा रजेचा अर्ज उपलब्ध नव्हता, तसेच विद्यार्थ्यांची जबाबदारी एका अनधिकृत व्यक्तीकडे सोपवल्याचे स्पष्ट झाले.
पालकांचा आक्रोश; विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा इशारा
या घटनेमुळे पालक संतप्त झाले असून, शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सोमवारी शिक्षकांचे जबाब घेऊन पुढील कारवाई केली जाईल, असे गटशिक्षणाधिकारी लावंड यांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आता शिक्षण विभाग या गंभीर प्रकरणाकडे कोणत्या पद्धतीने पाहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.