सांगली

सांगलीत सर्वात कमी ६३.११ टक्के मतदान

सांगली,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये बुधवारी झालेल्या निवडणुकीत सरासरी ७१.५७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. २०१९ च्या तुलनेत यंदा पाच टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली असून मतदारांनी उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. जिल्ह्यातील पलूस-कडेगाव या मतदारसंघात सर्वाधिक ७९.०२ टक्के तर सांगलीत सर्वात कमी ६३.११ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

मतदानाचा प्रारंभ आणि गती

सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला बोचऱ्या थंडीत सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत मतदानाची गती संथ होती; मात्र दुपारी एकनंतर त्यात चांगलीच वाढ झाली. दुपारी तीननंतर कार्यकर्त्यांची धावपळ वाढली आणि शेवटच्या काही तासांत मतदानाची टक्केवारी अधिक वाढल्याचे दिसून आले.

हे देखील वाचा: Eat peanuts for health/ आरोग्यासाठी खा शेंगदाणे: शेंगदाण्याचे महत्त्वाचे 8 फायदे जाणून घ्या

चुरस आणि संघर्ष

सांगली, शिराळा, जत, तासगाव-कवठेमहांकाळ या मतदारसंघांत प्रचाराच्या काळात तणावपूर्ण वातावरण होते. इस्लामपूर व पलूस-कडेगावमध्ये मोठ्या नेत्यांसमोर विरोधकांनी तगडी लढत दिली. खानापूर व मिरज या ठिकाणी मतदारांच्या भूमिकेबाबत करंट-अंडरकरंट चर्चेला उधाण आले.

मातब्बर नेत्यांचे भवितव्य

या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये कैद झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजप नेते व पालकमंत्री सुरेश खाडे, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी खासदार संजय पाटील यांच्यासह अनेक मातब्बरांचे भवितव्य आता २३ तारखेला स्पष्ट होईल. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांची पहिलीच निवडणूक असल्यामुळे त्यांच्याबाबतही उत्सुकता आहे.

हे देखील वाचा: Health Hazards from Adulterated Milk/ भेसळयुक्त दुधामुळे आरोग्य धोक्यात: आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम आणि त्यावरील उपाय; जाणून घ्या 6 महत्त्वाचे मुद्दे

सांगली जिल्ह्यातील आठ मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:
– पलूस-कडेगाव: ७९.०२%
– शिराळा: ७८.४५%
– इस्लामपूर: ७४.५१%
– तासगाव-कवठेमहांकाळ: ७४.१%
– जत: ७२%
– खानापूर: ७०.४१%
– मिरज: ६४%
– सांगली: ६३.११%

शांततेत मतदान; काही किरकोळ अपवाद

मंगळवारी सांगलीत झालेल्या हल्ल्याच्या घटनांनंतर बुधवारी मतदान शांततेत पार पडले. काही ठिकाणी किरकोळ बाचाबाचीच्या घटना घडल्या, मात्र त्यांचा मतदान प्रक्रियेवर फारसा परिणाम झाला नाही.

सांगली

अंतिम आकडेवारीची प्रतीक्षा

संध्याकाळी सहानंतरही अनेक ठिकाणी मतदान सुरू असल्याने अंतिम आकडेवारी गुरुवारी दुपारपर्यंत उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली. वाढलेल्या मतदान टक्केवारीमुळे मतदारांनी कुणाला कौल दिला, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे देखील वाचा: Life sentence: 35 कोटींच्या विम्यासाठी खुनाचा कट; बांधकाम व्यावसायिक अमोल पोवारला जन्मठेपेची शिक्षा

बुधवारी झालेल्या मतदानावर एक दृष्टिक्षेप

जिल्ह्यात २१ ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाला असल्याच्या घटना घडल्या आहेत. १४ बॅलेट युनिट, १२ कंट्रोल युनिटमध्ये बिघाड दिसून आला , तातडीने बदल करण्यात आले. जिल्ह्यातील जवळपास १४०० केंद्रांवर बेव कास्टिंगद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते. चिंचणी, वांगी, सागंली शहर या ठिकाणी बाचाबाचीचे प्रसंग उद्भवले. तर एका ठिकाणी मतदान प्रतिनिधीवर गुन्हा दाखल करण्यात आला. चाकरमान्यांच्या गाड्या भरून शिराळ्यात आल्या आणि हजारो मतदार मुंबईतून आले.

पुण्यातील नोकरदारांना सांगली, मिरजेत आणण्यासाठी खास बसची सोय करण्यात आली होती. सांगलीतील सावरकर शाळेतील ईव्हीएम यंत्र बंद पडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. ऊस पट्ट्यातून ऊसतोड कामगार गाड्या भरून जतला आल्या. यावेळेला असा प्रकार पहिल्यांदाच घडला. सांगलीत दोन उमेदवारांच्या समर्थकांत बाचाबाची झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *