हुलजंती येथे ‘महालिंगराया- बिरोबा यांच्या नावाने चांगभलं’ चा जयघोष
मंगळवेढा, (आयर्विन टाइम्स वृत्तसेवा):
धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आणि मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील महालिंगराया व हुन्नूर बिरोबा या गुरू- शिष्यासह सात देवतांच्या पालख्यांचा भेटीचा सोहळा लाखो भाविकांनी यांची देही याची डोळा अनुभवला. या भेट सोहळ्या दरम्यान ‘महालिंगराया- बिरोबा यांच्या नावाने चांगभलं’ या जयघोषाने तसेच नगारे, ढोल यांच्या आवाजाने सारा परिसर निनादून निघाला होता.
जिल्ह्यातील सर्वात मोठा भेटीचा सोहळा असलेल्या हुलजंती येथे गुरुवारी रात्री मुंडास बांधण्याचा सोहळा पार पडल्यानंतर आज दु. ४ च्या सुमारास महालिंगराया मंदिरालगतच्या ओढ्यात महालिंगराया-बिरोबा या गुरू-शिष्यासह शिरढोणचा बिरोबा – शिलवंती, बिज्जरगीचा बाळाप्पा, जिरअंकलगीचा बिरोबा, सोन्याळचा पांडुरंग विठ्ठल यांची भेट झाली. नगारा व ढोल वाजवत प्रत्येक पालखी महालिंगराया पालखीस भेट देत असताना ‘महालिंगराया बिरोबाच्या
नावानं चांगभलंच्या गजरात आकाशात भंडारा, लोकर व खोबरे उधळण्यात आल्याने परिसर भंडाऱ्याने न्हाऊन निघाला. या भेटीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू व गोवा आदी राज्यांतून सुमारे सात ते आठ लाखांहून अधिक भाविक दाखल होऊन याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवला.
महालिंगराया व बिरोबा या गुरू- शिष्यासह अन्य देवतांच्या भेटीच्या सोहळ्यानंतर मंदिर परिसरात भाकणूक झाली. या भाकणुकीकडे सोलापूर व उंब्रजच्या भाकणुकीप्रमाणे येथील भाकणुकीलाही विशेष महत्त्व व लक्ष लागून राहिलेले असते.
या भेटीच्या सोहळ्यास आमदार समाधान अवताडे, भगीरथ भालके, अनिल सावंत, प्रदीप खांडेकर, अंबादास कुलकर्णी, हनुमंत मासाळ, शिवाजी पटाप, बापू काकेकर, विजय माने, गोविंद भोरकडे, तहसीलदार मदन जाधव, सरपंच मीनाक्षी कुरमुर्ते, शिवानंद कुरमुत्ते, शांताप्पा बिराजदार, सचिन चव्हाण यांनी भेट दिली.
हे देखील वाचा: Shocking: 4 ऊसतोड मजूर सीना नदीत बुडाले; दीपावलीच्या पूर्वसंध्येला गावावर शोककळा
भाकणूक :पाऊसपाणी चांगले, ज्वारीचे पीक बंदा रुपया
भेट सोहळ्यानंतर मंदीर परिसरात होते. या भाकणुकीला सोलापूर येथील सिद्धरामेश्वर यांच्या भाकणुकीबरोबर महत्व असल्याने व भाकणुकीच्या आधारे बळीराजाकडून पुढील वर्षाची गणिते आखली जात असल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले होते. यावेळी राजकारणात प्रचंड प्रमाणात उलथा पालथ होईल व तीन तेरा नऊ अठरा अशी परिस्थिती निर्माण होऊन गोंधळाची परस्थिती निर्माण होईल, पुढील वर्षी पाऊसकाळ चांगला राहील, ज्याच्या घरी बैल त्यांना सोन्याची किंमत येईल, जे सत्य आहे तेच टिकेल अशी भाकणुक भेट सोहळ्यानंतर मंदीर परिसरात करण्यात आली.
सोहळ्यातील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या भाकणुकीमध्ये राजकारणात उलथापालथ होणार आहे. पाऊस-पाणी समाधानकारक, ज्वारीचे पीक बंदा रुपया येणार आहे. खरिपात पाऊस पाणी चांगले राहणार आहे. आरोग्य चांगले राहिल तरीही येणाऱ्या संकटावर मात करता येईल, अशी भाकणूक वर्तवण्यात आली.
हे देखील वाचा: Good news: सांगली सायबर पोलिसांची दिवाळी भेट: नागरीकांचे 7.50 लाखांचे 60 मोबाईल परत