सेवानिवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक: अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
मुंबई,(आयर्विन टाइम्स वृत्तसेवा) :
गुगलवर कस्टमर केअर नंबर शोधणे एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ५ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घालण्यास कारणीभूत ठरले आहे. फिक्स डिपॉझिटमधील १५ लाख रुपये बचत खात्यात वळवण्यासाठी श्रीकांत यांनी बँक कस्टमर केअरचा नंबर शोधून संपर्क साधला, पण सायबर ठगांनी त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम लंपास केली. पवई पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अंधेरी पूर्वेकडील मरोळ-मरोशी रोड परिसरात राहणारे श्रीकांत हे ६३ वर्षीय सेवानिवृत्त अधिकारी असून एअर इंडिया कंपनीमधून निवृत्त झाले आहेत. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या कलिना शाखेत बचत खाते आहे. त्यांच्या या खात्यात १५ लाखांची फिक्स डिपॉझिट ठेव होती, ज्याची मुदत २४ ऑक्टोबरला संपणार होती. या रकमेची पुनर्निवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठी श्रीकांत यांनी २३ ऑक्टोबर रोजी गुगलवर स्टेट बँक ऑफ इंडिया कस्टमर केअरचा नंबर शोधला.
कस्टमर सपोर्टचा बनावट अॅप डाउनलोड करण्याचा सल्ला
गुगलवर शोधल्यावर त्यांना एक नंबर मिळाला आणि त्यांनी त्या नंबरवर संपर्क साधला. समोरून उत्तर देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला आकाश वर्मा असे नाव सांगून एसबीआय कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले. या तोतया व्यक्तीने श्रीकांत यांना फिक्स डिपॉझिटच्या रकमेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर “कस्टमर सपोर्ट एपीके” नावाचे एक अॅप इन्स्टॉल करण्याचे सांगितले.
मोबाईलमधील संदेश फॉरवर्ड झाल्याचा प्रकार
अॅप इन्स्टॉल केल्यानंतर सेवानिवृत्त श्रीकांत यांना बँकेत जाऊन फिक्स डिपॉझिटची रक्कम खात्यात वळती करून मिळाली. परंतु, २५ ऑक्टोबरला श्रीकांत यांच्या खात्यातून दोन वेगवेगळ्या व्यवहारांतून एकूण ५ लाख ३० हजार रुपये गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाबरलेल्या श्रीकांत यांनी बँकेत धाव घेतली. बँक चौकशीदरम्यान कळले की, त्यांचा मोबाईलवर आलेले ओटीपी संदेश इतर तीन मोबाईल नंबरवर फॉरवर्ड झाले होते.
सायबर फसवणूक उघड
सेवानिवृत्त श्रीकांत यांना हे समजल्यावर त्यांनी तोतया आकाश वर्माने पाठवलेले अॅप तातडीने अनइन्स्टॉल केले. आरोपींनी मोबाईलवर आलेल्या ओटीपीच्या आधारे ऑनलाइन बँकिंगद्वारे श्रीकांत यांच्या खात्यातून पैसे काढल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर श्रीकांत यांनी सायबर क्राईम पोर्टलवर आपली तक्रार नोंदवली आणि पवई पोलीस ठाण्यात ५ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांकडून तपास सुरू
सध्या पवई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सायबर ठगांनी वापरलेले तंत्र आणि इतर तपशीलांचा शोध घेतला जात आहे. सायबर गुन्हेगारांकडून अशाप्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी नागरिकांनी गुगलवरून नंबर शोधताना सतर्कता बाळगावी आणि कोणत्याही अनोळखी अॅप्लिकेशनवर अवलंबून राहू नये, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.