जत

जत तालुक्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ

आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील बसरगी गावात गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मोठा हल्ला केला. गावातील मध्यवर्ती चौकात असणारी जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, स्ट्रॉंग रूमची भक्कम सुरक्षा यंत्रणा असल्याने बँकेचे लाखो रुपये सुरक्षित राहिले. तसेच, चोरट्यांनी गावातील आठ ते नऊ घरे फोडली असून चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या प्रकारानंतरही पोलिसांनी अद्याप नागरिकांच्या फिर्यादींची नोंद घेतलेली नाही, यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, जत तालुक्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

जत

घटनेचा आढावा

गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास बसरगी गावात अज्ञात चोरट्यांनी हल्ला केला. त्यांनी सर्वप्रथम बसरगी ग्रामपंचायतीजवळ असलेल्या जिल्हा बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न केला. बँकेच्या मुख्य दरवाजाचे कुलूप आणि चॅनेल गेट कटावणीने तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यांनी बँकेतील स्ट्रॉंग रूम फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु स्ट्रॉंग रूम मजबूत असल्याने त्यात ठेवलेली रोकड आणि सोनं सुरक्षित राहिली. बँकेत 32 लाख रुपयांची रोकड आणि सोनं-चांदी होती, जी या हल्ल्यात वाचवली गेली. चोरांनी मात्र बँकेतील कागदपत्रांची मोडतोड केली.

हे देखील वाचा : Shocking: शाळेच्या भरभराटीसाठी इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा नरबळी ; या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ

याचबरोबर, चोरांनी गावातील कस्तुरी, हुल्याळकर यांच्यासह जवळच्या वाड्या-वस्त्यांवरील आणखी सात ते आठ घरे फोडली. या घरांतून किरकोळ रक्कम, सोनं-चांदी आणि अन्य मौल्यवान वस्तू चोरल्या गेल्याचे सांगितले जाते. गावातील नागरिकांच्या मते, या चोरीतून सुमारे चार ते पाच लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

पोलीस तपास आणि कार्यवाही

शुक्रवारी सकाळी या घटनेची माहिती जत पोलिसांना मिळताच, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरज बिजली यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी एलसीबीचे पथक, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेत तपासाला सुरुवात केली. दिवसभर तपास सुरू असतानाही चोरट्यांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. चोरांचा शोध घेण्याचे काम सुरू असले तरी, अद्याप कुठलाही ठोस पुरावा मिळालेला नाही.

हे देखील वाचा : Murder case solved: तासगाव तालुक्यातील खुनाचा गुन्हा उघड; 19 वर्षीय आरोपी अटकेत; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी

जत

गावकऱ्यांचा रोष

चोरीचा मोठा हल्ला होऊनही, पोलिसांनी बँकेची तक्रार सोडता गावातील अन्य घरफोड्यांची फिर्याद अद्याप घेतलेली नाही. या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक गावकऱ्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर रोष व्यक्त केला आहे. त्यांना वाटते की, जत पोलिसांचे कायदा व सुव्यवस्थेवर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही. गावकऱ्यांनी असेही सांगितले की, गावात चोऱ्या, मारामाऱ्या, गुंडगिरी, आणि अवैध धंद्यांची प्रमाणात वाढ झाली आहे, परंतु पोलिसांकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही.

हे देखील वाचा : murder news : सासू-सासऱ्याकडून 35 वर्षीय जावयाचा खून: कोल्हापुरातील एस.टी. बसमध्ये घडलेली धक्कादायक घटना, सीसीटीव्हीच्या मदतीने उलगडा

यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना अधिकच वाढली आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून, चोरांना पकडण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *