सांगली जिल्ह्यात 800 योजनादूत नेमले जाणार
आयर्विन टाइम्स / सांगली
शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांना देण्यासाठी प्रत्येक गावात मुख्यमंत्री योजनादूत नेमण्यात येणार आहे. याबाबतची ऑनलाईन प्रक्रिया सुरु आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यास शनिवार (ता. ७) पासून सुरवात झाली आहे
प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर एक आणि शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक असे राज्यभरात ५० हजार ‘योजनादूत’ नेमले जाणार आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणे, हे या योजनादुतांचे काम असेल. ही नियुक्ती सहा महिन्यांसाठी असेल.
राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. त्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी राज्यात ५० हजार मुख्यमंत्री योजनादूत नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा सरकारी आदेश सात जुलै रोजी काढला होता. मात्र, नेमणूक प्रक्रियेला सुरवात झाली नव्हती. दरम्यान, इच्छुक पदवीधर बेरोजगार युवकांकडून रोजगार व कौशल्य विकास विभागाकडे विचारणा करीत होते. अखेर दोन महिन्यांनंतर शनिवारपासून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी आठवडाभराचा कालावधी दिला आहे.
राज्य माहिती संचालनालय बाह्य संस्थेमार्फत योजनादूतांकडून कामे करून घेणार आहे. त्यासाठी संचालनालयाने जिल्हास्तरावर जिल्हा माहिती अधिकारी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तर योजनादूत यांची निवड ही केवळ सहा महिन्यांसाठी राहणार आहे. त्यांचे मानधन रोजगार व कौशल्य विभागाकडून
दिले जाणार आहे. त्यासाठी ३०० कोटींची तरतूद केली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला एक, महापालिकेच्या प्रत्येक प्रभागाला एक आणि नगरपालिकांसाठी एक अशाप्रकारे योजनादूत निवडले जाणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी १३ सप्टेंबरपर्यंत करावे. निवडीनंतर त्यांना उपविभाग व जिल्हास्तरावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
नियुक्ती झालेल्या योजनादुतांना शासनामार्फत दरमहा १० हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणी या नियुक्तीसाठी पात्र आहेत. कोणत्याही शाखेचा पदवीधर व महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना या उपक्रमासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करता येईल. त्याला संगणकाचे ज्ञान, स्मार्ट फोन आणि आधार संलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे, अशी माहिती देण्यात आली.
कोण करू शकेल अर्ज
■ उमेदवाराचे वय १८ ते ३५ असावे
■ कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा
■ उमेदवाराला संगणक ज्ञान बंधनकारक उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असावा
■ उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
■ उमेदवाराचे आधार कार्ड असावे
■ आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असावे
अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे.
■ पदवी उत्तीर्ण असल्याचे कागदपत्रे, प्रमाणपत्र
■ आधार कार्ड
■ सक्षम यंत्रणेकडून अधिवासाचा दाखला
■ वैयक्तिक बँक खात्याचा तपशील.
■ पासपोर्ट साईज फोटो
■ अर्जाच्या नमुन्यातील हमीपत्र
उमेदवाराला मिळणारा लाभ
■ दरमहा १० हजार रुपयांचे मानधन
■ प्रत्यक्ष कामाचा अनुभव
■ सामाजिक बदलाचा भाग होण्याची संधी
■ शिकण्याबरोबरच कौशल्य विकास
■ सरकारी कामकाजाचा अनुभव
राज्यात क्षेत्रनिहाय जागा
■ ग्रामपंचायत : २७ हजार ८३४
■ नगरपालिका : पाच हजार ३८३
■ महानगरपालिका : एक हजार २९६
■ एकूण शहरी भाग : १९ हजार ६८२
■ एकूण ४७ हजार ५१६
सांगली जिल्ह्यात क्षेत्रनिहाय जागा
■ ग्रामपंचायती ७२६
■ नगरपालिका १०
■ महानगरपालिका १
■ एकूण एक हजार ७३७
योजनादूत यांनी करावयाची कामे
■ जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून योजनांची माहिती घेणे
■ नेमणुकीच्या ठिकाणी जाऊन योजनांची माहिती देणे