राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले, जो चुकतो तो माफी मागतो

आयर्विन टाइम्स / सांगली

राहुल गांधी यांनी गुरुवारी सांगली जिल्ह्यातील कडेगाव-वांगी  येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडणे हे शिवरायांचा अवमान असल्याचे सांगत, याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवरायांची माफी मागितली असली, तरी त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागायला हवी, अशी मागणी केली.

काँग्रेस नेते आणि संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते आज वांगी येथील सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावर काँग्रेसचे नेते व भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे लोकार्पण आणि पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर कडेगाव येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

राहुल गांधी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्षस्थानी होते. निमंत्रक आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

हे देखील वाचा: Do you want to start a business? तुम्हाला 10 लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीतून व्यवसाय करायचा आहे का? मग हे नक्की वाचाच…

पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाच्या कामाचे राहुल गांधी यांनी यावेळी कौतुक केले. सत्तर वर्षांनंतर इथे आलात तरी पुतळा मजबूत अवस्थेत दिसेल, असे म्हणत त्यांनी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याच्या घटनेवरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. ते म्हणाले, ‘मोदींनी शिवरायांची माफी मागितली, जो चुकतो तो माफी मागतो. मोदींनी का माफी मागितली ? पुतळा उभारणीचा ठेका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यक्तीला दिला म्हणून माफी मागितली का ? हे काम मेरिटवर द्यायला हवे होते, हे कबूल आहे का? पुतळा बनविताना त्यात भ्रष्टाचार झाला, चोरी झाली म्हणून माफी मागताय का? शिवरायांचा पुतळा बनविताना त्याबाबत पुरेशी दक्षता घ्यायला हवी होती, ती घेतली नाही म्हणून माफी मागताय का? हा महापुरुषाचा अवमान आहे, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. ‘

राहुल गांधी

ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जीवनमूल्ये शिकविली. प्रगतीचा मार्ग दाखविला, प्रोत्साहित केले. त्यांची विचारधारा हाच काँग्रेसच्या विचारांचा पाया आहे. तीच संविधानाची विचारधारा आहे. महाराष्ट्राचा डीएनए काँग्रेस विचारधारेचा आहे. आधी राजकारण चालत होते, आता देशात विचारधारेचे युद्ध सुरू आहे. एकीकडे महापुरुषांची आणि काँग्रेसची विचारधारा; तर दुसरीकडे भाजपचा मोजक्या लोकांच्या विकासाचा अजेंडा, जाती व्यवस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न अशी ही लढाई आहे. दलित, मागास, आदिवासी यांचा विकास होऊच नये, असा त्यांना वाटते. ते हिंसा आणि व्देषाचे राजकारण करतात.

धर्म, भाषा, जात याआधारे फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. ही लढाई आधीदेखील सुरू होतीच. ती तेव्हा शिवाजी महाराज, फुले, शाहू, डॉ. आंबेडकरांनी लढली; आज आपण लढतोय. मणिपूरमध्ये ‘सिव्हिल वॉर’सारखी स्थिती आहे. दीड वर्षे झाले, पंतप्रधान तिकडे फिरलेलेले नाहीत. कारण, भाजपने आग लावली आहे.’ काँग्रेसने जातनिहाय जनगणनेची मागणी केली तेव्हा ‘आरएसएस’ची नकारघंटा होती, आता ते ‘जनगणना करा’ म्हणत आहेत, मग सहा महिने आधी वेगळी भूमिका का होती, असा सवाल राहुल यांनी यावेळी उपस्थित केला.

हे देखील वाचा: Dry fruit business: सुक्या मेव्याचा व्यवसाय केवळ फायदेशीरच नाही तर समाजाच्या वाढत्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी एक चांगला पर्याय; कमी भांडवलात अधिक नफा देणाऱ्या व्यवसायाविषयी जाणून घ्या

तसेच नोटबंदी, चुकीची जीएसटी, शेतकरी आंदोलन, अदानी अंबानींचे हित या विषयावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला; जर उद्योगपतींचे १६ लाख कोटी कर्ज माफ केले जात असेल, तर गरिबांचेही तेवढे कर्ज माफ करा, असे आव्हानही त्यांनी दिले.

शरद पवार म्हणाले, ‘सातारा, सांगली जिल्ह्यांतील लढाऊ माणसांनी इतिहास घडविला. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापू लाड, वि. स. पागे, राजारामबापू अशा माणसांचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान राहिले आहे. तोच वारसा पतंगराव कदम यांनी पुढे चालवला. ‘
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, ‘मोदींचा जिथे हात लागेल तिथे सत्यानाश होत आहे. त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले, तो पडला. अहमदाबादला पूल पडला. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन केले, ते आता गळत आहे.

सगळीकडे गडबड सुरू आहे. मतांसाठी पुतळे बांधले, बांधकामांत घाई केली की असे होते. शिवराजांचा पुतळा पडल्याने महाराष्ट्राची सगळीकडे बदनामी झाली. आरएसएसच्या व्यक्तीने तो बनविला, मात्र योग्य काळजी घेतली नाही.

‘ जयंत पाटील- विशाल पाटील यांच्यात दीर्घसंवाद

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांची आसन व्यवस्था एकमेकाला लागून होती. या दोघांनी एकमेकांशी दीर्घसंवाद साधला. लोकसभा निवडणुकीत या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. व्यासपीठावर मात्र दोघांचा वावर सहज होता.

हे देखील वाचा: Diet and Nutrition: जाणून घ्या वजन कमी करण्याचे उपाय, तंदुरुस्ती टिकवून ठेवण्याचे उपाय, आणि पोषणावर आधारित माहिती

आघाडी मजबूत : खर्गे

महाराष्ट्रात महाविकास आघाडी मजबूत असल्याचा दावा खर्गे यांनी यावेळी केला. ते म्हणाले, ‘असली शिवसेना, असली राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. आमची आघाडी मजबूत असून, तिला कोणी हात लावू शकत नाही. आगामी विधानसभेला जोरदार टक्कर देऊ.

राहुल गांधी

इथले सरकार बदलेल.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकेल आणि देशातून मोदींची सत्तादेखील जाईल.’ पतंगराव कदम यांनी या भागाचा कायापालट केला. विकासाचा हाच वेग कामय राहण्यासाठी विश्वजित यांच्या पाठीशी उभे राहा, असे आवाहन नाना पटोले यांनी केले. खासदार विशाल पाटील यांनी आभार मानले.

व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीमंत शाहू छत्रपती, विशाल पाटील, प्रणिती शिंदे, आमदार मानसिंगराव नाईक, विक्रम सावंत, सुमन पाटील, अरुण लाड, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, ऋतुराज पाटील यांच्यासह माजी आमदार मोहनराव कदम, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, श्रीमती विजयमाला कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.

विचार, विकासाचा वारसा पुढे चालविण्यासाठी शपथबद्ध : विश्वजित

विश्वजित कदम म्हणाले, ‘राहुल गांधी महाराष्ट्र व देशाचे भविष्य बदलू शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई यशस्वी केली. आता तशीच लढाई राहुल गांधी अन्याय व भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होईल. पतंगराव कदम यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, यशवंतराव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले. त्यांनी मंत्रिपदाचा कालखंडात दुष्काळ, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीवेळी मदतीचा मोठ्या प्रमाणात जनतेला हा दिला. त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना करून खेडोपाड्यातील मुलांसाठी शिक्षणाची गंगा आणली.

हे देखील वाचा: Congratulations! पॅरिस पॅरालिंपिक स्पर्धेत सांगलीच्या सचिन खिलारीने 16.32 मीटर अंतरावर गोळा फेकत मिळवले रौप्यपदक

अडचणीच्या काळात पतंगराव व मोहनराव काँग्रेसच्या पाठीशी राहिले. सध्या जिल्ह्यासह राज्यातील जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे. पतंगरावांनी ज्याप्रमाणे आयुष्यभर सर्वसामान्य जनता आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कष्ट घेतले, त्याप्रमाणेच त्यांच्या विचारांचा व विकासाचा वारसा पुढे चालविण्याची मी शपथ घेतो.’

या सोहळ्यात मान्यवरांचे स्वागत ढोल-ताशाच्या गजरात

राहुल गांधी यांनी लोकतीर्थ स्मारक स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून सभास्थळी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले.  राहुल यांनी स्मारकस्थळी विठ्ठल मंदिर, गणेश मंदिर, भवानी मंदिरांत दर्शन घेतले. त्यांना जिल्हा काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देण्यात आली.

स्मारकस्थळी राहुल यांनी विश्वजित यांच्या मातोश्री विजयमाला कदम यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. डॉ. अस्मिता जगताप यांना अश्रू अनावर झाले. मल्लिकार्जुन खर्गे यांना महात्मा गांधी यांची प्रतिमा, तर शरद पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन सत्कार झाला  कडेगाव येथील भारती विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालय नामकरण व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रीडागृह नामकरण झाले  धनगर समाजातर्फे काठी, घोंगडं, ढोल देऊन राहुल यांचा सत्कार करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *