सांगलीच्या तरुणाला पोलिसांनी बारा तासांत केली अटक
आयर्विन टाइम्स / पुणे
पुणे जिल्ह्यातील चाकण येथील औद्योगिक वसाहतीतील आंबेठाण (ता. खेड) येथे एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून रविवारी (ता. २८) रात्री सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास एका तरुणीचा खून केला. प्राची विजय माने (वय २१, रा. उरुण इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली), असे तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी अविराज रामचंद्र खरात (वय २२, रा. बहे, ता. वाळवा जि. सांगली) या आरोपीला बारा तासांतच अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगली जिल्ह्यातील उरण इस्लामपूर येथील प्राची माने येथे एका खासगी कंपनीत काम करायची. ती मैत्रिणीसह आंबेठाणमध्ये राहायची. आरोपीने आंबेठाणमध्ये येऊन प्राचीला मोकळ्या पटांगणावर बोलावून घेतले. इथे दोघान्मध्ये वाद झाला. त्याने तिचा मोबाईल हिसकावून घेतला. प्राचीने लग्नास नकार दिल्याने त्याने चिडून तिच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार केले. त्यानंतर तो दुचाकीवरून पसार झाला.
पोलिस पथकाने सातारा ते कराड महामार्गावर दहा ते पंधरा किलोमीटर केला तरुणाचा पाठलाग
आंबेठाण येथे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड व पोलिस पथकाने आरोपीच्या मूळ गावी सांगली येथे जाऊन, घटनास्थळावरील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणात्मक तपास केला. तो सातारा ते कराड रस्त्यावर दुचाकीवरून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिस पथकाने सातारा ते कराड महामार्गावर सापळा रचून दहा ते पंधरा किलोमीटर त्याचा पाठलाग केला. मात्र, तो दुचाकी न थांबवता वेगाने पळ काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पथकातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून एकूण तीन मोबाईल व दुचाकी ताब्यात घेतली. ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सहायक पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर आदींच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलिस हवालदार यदू आढारी, सचिन मोरे आदींनी केली. आरोपीला पोलिसांनी बारा तासातच तपास करून गजाआड केल्याने लोकांमधून पोलिसांचे कौतुक होत आहे.