एलसीबीच्या पोलीस पथकाने पाठलाग करून केली कारवाई
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील उटगी येथे विजयपूर (कर्नाटक) मधून गुटखा पोती भरून पुणेकडे जाणाऱ्या ट्रक (केए २९ ए२ ५८८) वर एलसीबीच्या पोलीस पथकाने पाठलाग करून कारवाई केली. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ट्रकसह ७३ लाख ६० हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी उमदी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
उमदी पोलिस ठाणे हद्दीतील करजगी- उटगी मधल्या रस्त्यावरून ट्रक शुक्रवारी दुपारी वेगात जात असताना पेट्रोलिंगसाठी आलेल्या सांगलीच्या एलसीबीच्या पथकाला संशय आल्याने, पथकातील उपनिरीक्षक कुमार पाटील व पथकाने पाठलाग करून ट्रक पकडला. पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता गुटख्याने भरलेली पोती आढळली. गुटख्याच्या पोत्यांनी ट्रक पूर्ण भरला होता. ट्रकबाहेरील बाजूस नारळाची पोती लावलेली आत गुटखा, सुगंधी तंबाखूची पोती भरून ही वाहतूक केली जात होती. चालकचे नाव रवी अर्जुन होळकर कसरूडी (यवत, ता. दौंड) पुणे असे सांगितले. माल विजयपूर येथून आणला आहे.
हे देखील वाचा: Horoscope / राशिभविष्य आजचं 27 जुलै: कन्या, तूळ राशीसह 4 राशींना अपेक्षेपेक्षा अधिक लाभ मिळेल, इतरांनी देखील जाणून घ्या आपले भविष्य
पुणे येथील मॉन्टी उर्फ दर्शन तुरेकर (हडपसर, पुणे) यांच्या सांगण्यावरून माल आणल्याची कबुली त्याने दिली. जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या सुचनेनुसार एलसीबी उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे तपास करीत आहेत.
जतला म्हैसाळ विस्तारित योजनेच्या माध्यमातून अकरा टीएमसी पाणी उपलब्ध होणार: संजय पाटील
जत तालुक्यासाठी म्हैसाळ विस्तारित दुसऱ्या टप्प्याच्या कामास पंधरा दिवसात सुरू होणार आहे. तसेच जत विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही, असे प्रतिपादन माजी खासदार संजय पाटील यांनी केले. जत येथे पत्रकार बैठकीत ते बोलत होते. पाटील म्हणाले, जत विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. आपापल्या परीने ते कामालाही लागले आहेत. प्रत्येकाची इच्छा असणे साहजिक आहे. पक्षाच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाईल. जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे जाणून जो निवडून येऊ शकेल, तो उमेदवार पक्ष निश्चित करेल.
मी जत किंवा सांगली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी पक्षाकडे कोणतीही इच्छा व्यक्त केलेली नाही. मात्र, पक्षाकडून जो उमेदवार निश्चित केला जाईल, त्याचा सर्वांनी एकत्रित प्रचार करायचा आहे. कोणतीही बंडखोरी पक्षात होणार नाही. जो काम करणार नाही, पक्षही त्याचा विचार करणार नाही. संख येथे दोनशे मेगा वॅटचा सौरऊर्जा प्रकल्प वर्षाच्या आत पूर्ण होणार आहे. जुने पंपहाऊस व त्याच्या देखभालीसाठी २५० कोटीचा निधीची तरतूद केली आहे. यावेळी डॉ. रवींद्र आरळी, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, रवींद्र सावंत, मोहन कुलकर्णी, दिग्विजय चव्हाण, अप्पासाहेब नामद उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी जत तालुक्यातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. म्हैसाळ विस्तारित योजनेचे ५२ पैकी २६ किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. वितरिकेच्या कामाची निविदा निघाली असून लवकरच त्याला सुरुवात होणार आहे. शिवाय, विस्तारित म्हैसाळची उर्वरित निविदा मंजूर करून येत्या पंधरा दिवसात कामाचा प्रारंभ होईल. या योजनेच्या माध्यमातून जतला ११९ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली.
जत तालुक्यातील माडग्याळला मनमंदिर पतसंस्थेची शाखा सुरू
मनमंदिर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (ता. खानापूर) या पतसंस्थेची माडग्याळ येथे शाखा सुरू झाली. आज या शाखेचे उद्घाटन झाले. या गावात सहकारी पतसंस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. आज विटा येथील मनमंदिर पतसंस्थेच्या माडग्याळ शाखेचे उद्घाटन झाले. मनमंदिर पतसंस्थेची जत तालुक्यात माडग्याळ येथे शाखा सुरू झाली. यावेळी व्यापारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अशोक गायकवाड, माडग्याळ सरपंच अनिता माळी, उपसरपंच बाळासो सावंत, ग्रामपंचायत सदस्य निर्मला कोरे, संगीता कोरे यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेदाण्याची आवक वाढली, दर घसरला उत्पादक आर्थिक संकटात
बाजारात बेदाण्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दर कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे तब्बल तीन महिने उठाव झाला नसल्याने शीतगृहे ( कोल्ड स्टोअरेज) फुल्ल आहेत. दरामध्येही मोठी घसरण झाली आहे. सध्या सरासरी १०० ते १३० रुपये दर मिळत आहे. पाण्यासाठी करण्यात आलेला खर्च, मशागतीचा खर्च, शीतगृहाचे भाडे वजा जाता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. दर परवडणारा नसल्याने बेदाणा उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे.
तालुक्यात प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर शेतकऱ्यांन द्राक्ष बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. दर्जेदार सुंटेखाणी आकाराचा बेदाणा, हिरव्या रंगाचा आकर्षक बेदाणा, दोन सेंटिमीटरहून अधिक लांबीचा फुगीर बेदाणा तयार केला जातो.
देशात लोकसभेच्या निवडणुकीचा बेदाण्याच्या उठावावर परिणा झाला. या निवडणुकीमुळे तीन महिने देशांतर्गत जाणारा बेदाणा गेला नाही. उठाव झाला नसल्याचा परिणाम दर कमी झाला. यंदा बेदाण्याचे सव्वादोनशे टन उत्पादन झाले आहे. या वर्षी टँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत. लाखो रुपये खर्च केलेले आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे फळ मोठे होण्यास, मण्यांचा आकार वाढण्यास, मणी फुगण्यास अनुकूल स्थिती लाभली नाही. त्यामुळे द्राक्षघड आणि मणी लहान तयार झाले आहेत. बागायतदारांनी भाव कमी झाल्याने शीतगृहामध्ये माल वॉशिंग, त्याची प्रतवारी करून ठेवला आहे.
हे देखील वाचा: Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यात लागोपाठ 2 मुलांचे खून: एकाचा मृतदेह जंगलात फेकला तर दुसऱ्याचा मृतदेह उकिरड्यात पुरला; जिल्हा हादरला
बेदाणा आणि द्राक्षदरात विविध कारणांनी वारंवार घसरण होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी बेदाणा आणि द्राक्षाला हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. शीतगृहाच्या भाड्यावर हजारो रुपये खर्च केले आहेत. सध्या जुना आणि नवीन बेदाण्यामुळे शीतगृहेच फुल्ल आहेत. नैसर्गिक आपत्ती व दरातील चढ – उताराला सामोरे जावे लागत आहे.
मशागत, खते आणि मजुरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दुसरीकडे, बेदाण्याला दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. दुष्काळी परिस्थितीने बेजार झाले असल्याने कमी भावाने बेदाणा विकण्याची वेळ उत्पादकावर आली आहे. सध्या चांगला हिरवा बेदाणा १३० ते १४० रुपये, पिवळा बेदाणा १०० ते १३८ रुपये दर मिळत आहे. हा दर शेतकऱ्यांना परवडणारा नाही. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडले आहे. कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
जत तालुक्यातील जालिहाळ बुद्रुक येथील येरळावाणी रेडिओ सेवेला माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा पुरस्कार
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने देशातील पहिल्या दहा उत्कृष्ट रेडिओ सेवांमध्ये सांगलीतील येरळा वाणी या सामुदायिक रेडिओ सेवेची निवड केली आहे. समाजाभिमुख आणि प्रयोगशील उपक्रम राबविणारी रेडिओ सेवा या विभागात देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे. येरळा वाणीला मिळालेला हा तिसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. जालिहाळ बुद्रुक (ता. जत) आणि परिसरात येरळाच्या प्रकल्प विभागात या रेडिओ सेवेचे प्रसारण होते. विधवा पुनर्विवाहांना उत्तेजन देण्यासाठीही उत्कृष्ट रेडिओ सेवेचा पुरस्कार सांगलीतील येरळा वाणीला मिळाल्याबद्दल नारायण देशपांडे यांचे नीता जोशी, जान्हवी खाडिलकर आदींनी अभिनंदन केले.
हे देखील वाचा: Paris Olympics : पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेतून भारताला 2 अंकी पदकांची अपेक्षा : या स्पर्धेत भारताचे 117 खेळाडू होत आहेत सहभागी
सकारात्मक कार्यक्रम प्रसारित केले जात असतात. मुलगाच हवा हा सुनंदाच्या सासरच्या नातेवाइकांचा हट्ट आणि शास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब करीत तिने कुटुंबियांचे केलेले यशस्वी सामाजिक प्रश्नांना प्राधान्य रेडिओ सेवेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न हाताळणे, लोकांना चांगल्या विचाराने प्रेरित करणे तसेच शेती, आरोग्य, महिला सबलीकरण, शिक्षण आदी संदर्भातील प्रश्नांवर येरळा वाणी काम करते. बालविवाह, मुलगा हवा या हट्टापोटी एकापेक्षा जास्त लग्ने आणि त्यातून निर्माण होणारे परित्यक्त्यांचे प्रश्न यालाही येरळा वाणीने प्राधान्य दिले आहे.
मतपरिवर्तन ही कथा नाट्य रूपांतरित करून येरळा वाणीने स्पर्धेसाठी पाठवली होती. ती पहिल्या पारितोषिकासाठी निवडण्यात आली. तिचे निवेदन आणि नाट्यलेखन नीता जोशी यांनी केले होते. निखिल आणेगिरीकर, जान्हवी खाडिलकर, अश्विनी खाडिलकर यांचा कार्यक्रमात सहभाग होता. नारायण देशपांडे आणि अपर्णा कुंटे यांनी मार्गदर्शन केले. समाजाभिमुख आणि प्रयोगशील उपक्रम राबविणारी रेडिओ सेवा म्हणून येरळा वाणी काम करते. समाजातील ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे तसेच त्या प्रश्नांवर मान्यवरांना बोलते करण्याचे काम या माध्यमातून होते.