जत तालुक्यातील अचकनहळ्ळी येथून दोघे भाऊ दुचाकीवरून सांगोला येथे गायी खरेदीसाठी निघाले होते
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील सिंगनहळ्ळी गावच्या हद्दीत दुचाकीवरून सांगोलाच्या दिशेने निघालेल्या दोघा भावांना चारचाकी वाहनाची धडक बसल्याने एकाचा उपचारासाठी जात असताना मृत्यू झाला. तर एक जखमी झाला आहे. प्रशांत गणपती पाटील ( वय २६) असे मृताचे नाव आहे. सुशांत गणपती पाटील (वय २८, दोघे अचकनहळ्ळी, ता. जत) हा जखमी झाला आहे.
रविवारी (ता. २१) सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झालेली नव्हती. पोलिस व नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी, की प्रशांत व सुशांत पाटील हे दोघे भाऊ दुचाकीवरून सांगोला येथे जनावरांचा बाजार भरत असल्याने गायी खरेदीसाठी निघाले होते. सिंगनहळ्ळी गावाच्या बाहेर दोनशे मीटर अंतरावर रस्त्यावर समोरून चारचाकी मालवाहतूक गाडीने दुचाकीला जोरदार धडक देऊन दुचाकीला फरफटत घेऊन गेले.
हे देखील वाचा: World Brain Day / विश्व मेंदू दिवस 22 जुलै : लोकांना मेंदूशी संबंधित सर्व आजारांची माहिती व्हायला हवी
यामध्ये प्रशांत पाटील याच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जतमधील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परिस्थिती चिंताजनक असल्याने मिरज येथे घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. मोठा भाऊ सुशांत याच्या हाताला मार लागला आहे. मोठी दुखापत झाली आहे.
या घटनेची जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती. प्रशांतच्या पश्चात वडील, मोठा भाऊ, पत्नी, तीन महिन्यांची लहान मुलगी व एक वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेने अचकनहळ्ळी गावातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले की, अपघात झाला आहे. त्याची नोंद अजून झाली नाही. माहिती येताच गुन्हा नोंद केला जाईल.

ऊसतोड मजूर पुरवण्याच्या आमिषाने ३ लाखांचा गंडा; अक्कळवाडी येथील एकावर गुन्हा दाखल
ऊसतोडीसाठी मजूर पुरवण्याच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अमोल जगन्नाथ कोळी (सावळवाडी, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मुकादम मल्लाप्पा अमिनप्पा नांग (अक्कळवाडी, ता. जत) याच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की एप्रिल २०२२ मध्ये मुकादम मल्लाप्पा नांग याने अमोल कोळी यांना ऊसतोड मजूर पुरवतो, असे सांगून वेळोवेळी ३ लाख ५ हजार रुपये घेतले होते. परंतु, ऊस हंगामात मुकादमाने मजूर पुरवले नाहीत.
कोळी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही मुकादम नांग याने ऊसतोड मजूर पुरवले नाहीत आणि पैसेही परत दिले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कोळी यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.
जत तालुक्यातील शेतकऱ्यांना ६१ कोटी अनुदान मंजूर: आमदार विक्रमसिंह सावंत
जत तालुक्यातील जवळपास एक लाख ४४ हजार ४८२ शेतकऱ्यांना ६१ कोटी २९ हजार ६१२ इतकी रक्कम नुकसानभरपाई अनुदान मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनाअंतर्गत सन २०२३ – २४ मध्ये खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी तूर, मुग, उडीद, भुईमुग,
मका, बाजरी आदी पिकांचा शेतकऱ्यांनी पिक विमा उतरविला होता. तालुक्यात एक लाख ४४ हजार ४८२ शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला होता.
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. शेतामध्ये पेरणी केलेले संपूर्ण पिक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. पिक विमा रक्कम मोठ्या प्रमाणावर थकीत होता. आमदार सावंत यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना पिकविमा रक्कम तातडीने मिळावे म्हणून सभागृहासमोर मागणी केली. या मागणीची दखल घेऊन १ लाख ४४ हजार ४८२ शेतकऱ्यांना जवळपास ६१ कोटी २९ हजार ६१२ इतकी रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा: गुरुपौर्णिमा 21 जुलै : शिक्षकाचा प्रवास; गुरुकुलातील शिक्षक ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानातला एआय शिक्षक / Modern Technology AI Teacher
उमदी येथून २८ रोजी जनकल्याण संवाद पदयात्रेला प्रारंभ
भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यात तब्बल तीनशे किलोमीटरची जनकल्याण संवाद पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती, निवृत्ती शिंदे- सरकार, बसवराज पाटील व टीमूभाई एडके यांनी पत्रकार बैठकीत दिली. निवृत्ती शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत जत तालुका मागास का राहिला? या विषयाचे मंथन व तालुक्याच्या विकासावर जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येणार आहे.
ही यात्रा दोन टप्प्यात करण्यात येणार असून पहिल्या टप्प्याचा शुभारंभ दि. २८ जुलै रोजी उमदी येथून होणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा ठिकाणी मुक्काम करून सातव्या दिवशी पदयात्रा जत शहरात पोहोचेल. तेथे सांगता समारंभ होणार आहे.