उमदी (जत) पोलिसांनी अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक प्रकरणाचा केला कसून तपास
आयर्विन टाइम्स / जत
जत तालुक्यातील खंडनाळ येथील इंदू पांडुरंग बिराजदार (वय ४०) या विवाहितेचा मृतदेह १० जुलै रोजी जवळच्या विहिरीत आढळून आला होता. तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले होते. कारण अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. साहजिकच ४० वर्षीय महिलेच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्याने पोलिसही चक्रावले. मात्र या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक प्रकरणाचा कसून तपास केला. आणि खुनी शोधून काढला.
यासाठी उमदी पोलिसांनी महिलेच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले, शवविच्छेदन अहवाल पाहिला आणि खबऱ्याकडून माहिती काढून उमदी पोलिसांनी चार दिवसात खुनाचा छडा लावला. संशयित तम्मा श्रीमंत कुलाळ (वय ४१, रा. खंडनाळ) याच्या मुसक्या आवळल्या. यामुळे उमदी पोलिसांचे कौतुक होत आहे.
संशयित आरोपीने फोन करून महिलेला भेटायला बोलावून घेतले
उमदी पोलिसांच्या माहितीनुसार जत पूर्व भागातील खंडनाळ येथील इंदू बिराजदार व तिची लहान मुलगी प्रतीक्षा या दोघी मंगळवारी दि.९ रोजी सायंकाळी ६ वाजता आवटी वस्तीवर नातेवाइकांना भेटायला गेल्या होत्या. भेटून दोघी मायलेकी घराजवळील रस्त्यावर आल्या. तिला आरोपी तम्मा कुलाळने फोन करून भेटायला बोलवले. मुलीला रस्त्यावरूनच घरी पाठवून रात्री साडे आठ वाजता घराच्या उत्तरेला अर्धा कि.मी. अंतरावरील विहिरीजवळ ती भेटायला गेली.
हे देखील वाचा: Sangli Crime : सांगली जिल्ह्यात कर्नाटकच्या सराईत चोरट्याकडून 90 हजारांचे दागिने हस्तगत ; एका सराफी दुकानात केली होती चोरी
घरच्यांनी शोध घेतला पण महिला आढळून आली नाही
यावेळी इंदू आणि तम्मा कुलाळ यांच्यात उसने घेतलेल्या चार लाख रुपये परत देण्यावरून वादावादी झाली. विहिरीजवळील बाजरीत त्यांच्यात झटपट देखील झाली. रागाच्या भरात तम्माने तिच्या डोक्यात जोराने मारल्याने इंदू बेशुद्ध पडली. अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेऊन तिचा देह विहिरीत टाकून दिला. तेथून तो काहीच घडले नाही असे दाखवत घरी निघून गेला. इकडे इंदूचा मुलगा बबलू गावातून घरी आल्यावर आई घरी आली नाही म्हणून मोबाइलवर कॉल केला. परंतु तो बंद होता. घरच्यांनी रात्री तिची शोधाशोध केली, पण ती मिळून आली नाही.
बुधवारी (दि. १०) रोजी दुपारी तीन वाजता विहिरीत मृतदेह आढळून आला. याबाबतची पोलिस पाटील खंडू पुजारी यांनी उमदी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांना प्राथमिक तपासात आत्महत्या की खून असा प्रश्न पडला. शवविच्छेदन अहवाल व डॉक्टरच्या चर्चेतून खून झाल्याचे निष्पन्न झाले. परंतु आरोपी निश्चित करण्याचे आव्हान होते.
आरोपी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात राहून पोलिसांना देत होता गुंगारा
पोलिसांनी मृत इंदूच्या मोबाइलवरील फोन कॉल डिटेल्स तपासले. गावातील तम्मा कुलाळचा दिवसभरात अनेक वेळा फोन झाला होता. घटना घडल्यापासून तो फरार होता. त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला. तम्माला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके पाठवली. त्याने मोबाइल बंद ठेवला होता. तसेच तो सतत जागा बदलत होता. त्यामुळे त्याचा सुगावा लागणे अवघड होते. पथक कर्नाटकातही शोध घेत होते. आरोपी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात राहून आपले अस्तित्व लपवत होता. परंतु पोलीस पथकाचा कसून शोध चालूच होता.
अखेर पथकाने शिताफीने व कसोशीने प्रयत्न करून मोटेवाडी, पांडोझरी भागात तम्मा कुलाळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी (दि. १२) रोजी अटक केली. पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष माने, वहिदा मुजावर, आप्पासाहेब हाक्के, अगतराव मासाळ, मनिष कुमरे, सोमनाथ पोटभरे, दशरथ कोकाटे, आप्पासाहेब घोडके, सुदर्शन खोत यांनी तपास केला. प्रारंभी आत्महत्या वाटणारी ही घटना खुनाची असल्याचे स्पष्ट झाले.
आर्थिक वादातून घटना
तम्मा कुलाळने आर्थिक वादातून इंदूच्या डोक्यात हाताने मारून बेशुद्ध झाल्यावर विहिरीत टाकून खून केल्याचे कबूल केले. मृतदेह टाकलेल्या विहिरीच्या बाजूला कचऱ्याचा मोठा ढिगारा आहे. सहजासहजी दिसत नसल्यामुळे हे ठिकाण त्याने निवडलेले होते.
चार दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर संशयित आरोपीला पकडण्यात यश
जत तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी सांगितले कि, संशयित आरोपी सतत जागा बदलत होता. मोबाईल बंद ठेवत होता. त्याला पकडण्याचे मोठे आव्हान होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चार दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर त्याला पकडण्यात यश आले.