बिळूरात घरफोडी ७० हजारांचा मुद्देमाल लंपास
आयर्विन टाइम्स / जत
जत परिसरातील बातम्या: जत तालुक्यातील बिळूर येथील अनिता अनिल जयगोड यांच्या शेतातील राहते घरी भरदिवसा अज्ञात चोरट्याने कडी तोडून घरात प्रवेश केला आणि सुमारे ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. बिळूर येथील जिरग्याळ रोडवर जयगोड यांचे घर आहे.
घराचे कडी व कुलुप अज्ञात चोरट्याने तोडुन घराचे आत प्रवेश करुन २२ हजार रु. चे ६.३० ग्रॅमची सोन्याची चेन, १७ हजार ५०० रु., ५ ग्रॅमची सोन्याची पिळ्याची अंगठी, ८ हजार ७००रु., २.५ ग्रॅ मची सोन्याची रिंगा, ५ हजार २०० रु. चे १.५ ग्रॅमची सोन्याची लेडीज अंगठी, २२००रु.७० ग्रॅमचे चांदीचे पैजण ५००० रु विवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम त्यामध्ये ५०० रुपयेच्या २० चलनी नोटा असा मिळून एकुण ७० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अनिता जयगोंड यांनी बुधवारी रात्री उशिरा जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
जत तालुक्यातील उमदीत युवकाची आत्महत्या
जत तालुक्यातील उमदी येथील विशाल श्याम मठपती (वय २२) याने आपल्या राहते घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. विशाल हा बीएससी पहिले प्रथम वर्गात शिकत होता. त्याच्या घरी स्वतःसाठी स्वतंत्र स्टडी रूम होती. या खोलीतच त्याने दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मात्र वडिलांनी रागावल्याच्या कारणावरून त्यांनी आत्महत्या केली असावी असा नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.
शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह रात्री जत येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. रात्री उशिरा शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे.
मोटार ट्रॅक्टरच्या अपघातात अमृतवाडीजवळ एक ठार; चार जखमी : मृत तरुण मूळचा बत्तीस शिराळा येथील
अमृतवाडी फाट्याजवळ जतपासून पाच किलोमीटरवर मोटारीने नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने मोटारीमधील एक जण जागीच ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. राजन युवराज नायकवडी (वय २७, ढोलेवाडी, ता. बत्तीस शिराळा) असे मृताचे नाव असून मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.
दरम्यान, विजय ऊर्फ बंडू कृष्णदेव सांगोलकर (वय ४५, मंगळवेढा), गणेश गायकवाड (२६, आटपाडी), आकाश व्हनमाने (२३, सोलापूर), प्रदीप स्वामी (२३, जत) अशी जखमींची नावे आहेत. दोघांवर मिरजेच्या सिव्हिल रुग्णालयात, तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पेरणीचा ट्रॅक्टर मुचंडीहून जतच्या दिशेने निघाला होता. राजन नायकवडी हा मोटारीतून (एमएच १४, एफ एस ०७७०) बत्तीस शिराळ्याला निघाला होता. येथील अमृतवाडी फाट्याजवळ भरधाव मोटारीने पाठीमागून जोराची धडक दिली.
यामध्ये राजन याचा मृत्यू झाला, चौघे गंभीर जखमी आहेत. मृत राजन हा बत्तीस शिराळाजवळील ढोलेवाडी येथील असून जत येथे आशीर्वाद गोल्ड लोन येथे नोकरीला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृत राजन याच्या मागे आजी- आजोबा, आई-वडील, बहीण असा परिवार आहे. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.
आ. विक्रमसिंह सावंत यांनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट; जतला भरीव निधीची मागणी
आ. विक्रमसिंह सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विविध विकासकामांचे निवेदन दिले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी चर्चेदरम्यान सकारात्मक प्रतिसाद दिला असून जतला निधी देवू तसेच विस्तारित म्हैसाळ योजना मार्गी लावणे तसेच कर्नाटकातील तुबची- बबलेश्वर योजनेतून पूर्व भागातील तलाव भरण्यासंदर्भात लवकरच बैठक घेवू, अशी ग्वाही दिल्याची माहिती आ. सावंत यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास कार्यक्रम अंतर्गत तालुक्यातील बेळोंडगी, येळवी, जाडरबोबलाद, सोन्याळ, बोर्गी बु., उटगी, जालिहाळ खु., डफळापूर, करजगी, अंतराळ, काराजनगी, बोगी खु., कागनरी, येळदरी, वज्रवाड, बागेवाडी, माडग्याळ, शेगाव, गुळवंची, कुडनूर, सोरडी, डोरली, बसर्गी या गावातील विविध विकासकामांना मंजुरी मिळावी.
हे देखील वाचा: राशीभविष्य आजचं 29 जून: कर्क, कन्या राशीसह 5 राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल, जाणून घ्या इतर लोकांनीदेखील आपले राशिभविष्य
त्याचबरोबर दरीकोनूर, उमदी, डफळापूर, करजगी, सोनलगी, सोन्याळ, जाडरबोबलाद, येळवी, उटगी, साळमळगेवाडी, धावडवाडी, उमराणी, गुगवाड, घोलेश्वर, अंकलगी या गावातील अल्पसंख्याक समाजाच्या कामास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आ. सावंत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबरच आ. सावंत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विस्तारित व तुबची बबलेश्वर योजनेबाबत त्यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्राचे जे पाणी कर्नाटककडे शिल्लक आहे ते पाणी तुबची बबलेश्वर योजनेतून जत पूर्व भागात सोडून त्या भागातील तलाव भरून घ्यावेत, अशी मागणी आ. सावंत यांनी केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरात लवकर बैठक लावून प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही देत पत्रावर रिमार्कही केल्याचे आ. सावंत यांनी सांगितले.