ईश्वरपूरमध्ये धक्कादायक घटना

ईश्वरपूरमध्ये एका तरुणाने किरकोळ आर्थिक वादातून स्वतःच्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली.

(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी)
ईश्वरपूर, सांगली: किरकोळ वादातून संतापाच्या भरात एका तरुणाने स्वतःच्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आणखी धक्कादायक म्हणजे, हा तरुण स्वतःच ईश्वरपूर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली देत दाखल झाला. या घटनेने पोलिस यंत्रणा आणि परिसर दोन्ही हादरून गेले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या तरुणाने खून केल्यानंतर मैत्रिणीचा मृतदेह पोत्यात भरून कृष्णा नदीत फेकल्याची कबुली दिली आहे. त्यानंतर त्याने पीडितेची दुचाकीही नदीत फेकून दिल्याचे सांगितले. सायंकाळी उशिरा ताकारी (ता. वाळवा) येथील नदीपात्रात ती दुचाकी सापडल्याने या प्रकरणाला अधिक दुजोरा मिळाला आहे.

ईश्वरपूर

 

घटनेचा सविस्तर तपशील

पीडिता वाळवा तालुक्यातील एका गावात दोन मुलींसह वास्तव्यास होती. तिचे पती कर्नाटकात मजुरीचे काम करतात. घरखर्च भागविण्यासाठी ती खासगी रुग्णालय, खानावळ आणि इतर ठिकाणी काम करत होती. या काळात तिची ओळख बोरगाव येथील एका तरुणाशी झाली. त्याच्या आईच्या उपचारासाठी तो ईश्वरपूरमधील एका खासगी रुग्णालयात येत असे, तेव्हापासून दोघांमध्ये ओळख आणि नंतर मैत्री वाढली.

या मैत्रीतून काही आर्थिक व्यवहार झाले होते. मात्र, त्याच व्यवहारांवरून दोघांमध्ये सातत्याने वाद सुरू असल्याची चर्चा आहे. काल (बुधवार) सायंकाळी साडेपाच वाजता पीडिता त्या तरुणासोबत घराबाहेर पडली, मात्र त्यानंतर ती परत आलीच नाही. रात्री उशिरापर्यंत आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंतही ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हेदेखील वाचा: sangli crime news: सांगली बातम्या: निखिल साबळेचा खून : संशयित सुतारला 5 दिवसांची पोलीस कोठडी, याशिवाय वाचा अपहरण, फसवणूक आणि सोशल मीडियावर दहशत निर्माण करण्याचे प्रकार उघडकीस आलेल्या बातम्या

पोलिस यंत्रणेची धावपळ

दरम्यान, काही तासांनी संशयित तरुण स्वतः पोलिस ठाण्यात दाखल झाला आणि आपल्या मैत्रिणीचा खून केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सांगलीतील आयुष हेल्पलाईनच्या रेस्क्यू पथकाच्या मदतीने नदीत शोधकार्य हाती घेण्यात आले.

सायंकाळी उशिरा पीडितेची मोपेड नदीपात्रात सापडली; मात्र अंधारामुळे मृतदेहाचा शोध घेणे कठीण झाले. त्यामुळे रात्री शोधमोहीम थांबवून ती आज सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि त्यांचे पथक घटनास्थळी कार्यरत आहेत.

परिसरात चर्चेचा विषय

या घटनेमुळे ईश्वरपूर व ताकारी परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ आर्थिक वादातून एवढे टोकाचे पाऊल उचलल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *