जत शहरात आत्महत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना
आयर्विन टाइम्स / जत
शहरात दोन तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तीन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या तरुणाने शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बिरनाळ तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचबरोबर शहरातील शिवाजी पेठेत राहणाऱ्या तरुणाने घरात कोणीही बसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. जत पोलिसांत या घटनांची नोंद आहे.
तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाने जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बिरनाळ तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. संदेश प्रकाश कांबळे (वय २१, रा. डॉ. आंबेडकर नगर) असे मृत तरुणाचे नाव असून आज सकाळी ६ वाजता ही घटना निदर्शनास आली. त्याने कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मृत संदेश हा मंगळवारी (ता. २०) रात्री १० वाजता घरातून निघून गेला होता. संदेश यांच्या घरातील नातेवाईक त्याचा शोध घेत होते. याबाबत पोलिसांत त्याची बेपत्ता असल्याची तक्रारही दिली होती. शुक्रवारी सकाळी बिरनाळ तलावाच्या जॅकवेलपासून काही अंतरावर त्याची दुचाकी लावलेली दिसून आली.
त्या गाडीच्या नंबर वरून त्याचा शोध घेतला तर ती गाडी संदेशची असल्याची खात्री पटल्यानंतर नातेवाईक व मित्रमंडळी घटनास्थळी दाखल झाली. त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्याच्या मागे आई, दोन बहिणी असा परिवार आहे.
जत येथे मोबाईल शॉपी फोडून ४० हजारांचे मोबाईल लंपास
एस.टी. बसस्थानक परिसरातील बालाजी मुंडे यांच्या मालकीचे स्टार मोबाईल शॉप फोडून त्यातील ४० हजारांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. गुरुवारी रात्री चोरट्यांनी दुकानाचा पत्रा उचकटून प्रवेश केला आणि दुकानातील दुरुस्तीसाठी आलेले आठ-दहा किंमती मोबाईलवर हात मारला. पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी पेठेतील एकाची गळफास घेऊन आत्महत्या
जत येथील शिवाजी पेठेत वास्तव्यास असणाऱ्या राजू उमाजी जाधव (वय ५३) यांनी शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी राजू यांची पत्नी व मुलगा कामाला गेल्यानंतर राजू यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली.