मैत्रिणींचे मृतदेह; घातपात की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण
आयर्विन टाइम्स / नाशिक
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील लिंगामा येथील एका विहिरीत दोन मैत्रिणींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली असून हा घातपात की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
अधिक माहिती अशी की, लिंगामा शिवारातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी (दि. २६) रोजी माधुरी गोकुळ मोरे (२०, रा. लिंगामा ता. कळवण), गीतांजली अल्केश एखंडे (१३, रा. धोडांबे ता. सुरगाणा ) या दोघा मुलींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेची खबर पोलिस पाटील एकनाथ पालवी यांनी दिली. अभोणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून घटनेचा पंचनामा केला.
अभोणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. या घटनेची अभोणा पोलिसांत अकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक नवनाथ रसाळ हे करीत आहे. गोकुळ मोरे (लिंगामा ) व अल्केश एखंडे (धोडंबे ) यांचे घरोब्याचे संबंध असल्याने एकमेकांच्या घरी येणे-जाणे असायचे. त्यामुळे माधुरी व गीतांजलीत चांगली मैत्री जडली होती. माधुरी अर्धवट शिक्षण सोडून घरीच लिंगामा येथे होती.
तर गीतांजली बोरगावच्या डीपी हायस्कूलमध्ये इयत्ता ८ वीत शिक्षण घेत होती. त्यामुळे या मैत्रिणी नेहमी एकमेकांच्या घरी रहात होत्या. गीतांजली हुषार असली तरी शाळेला अनेकदा दांडी मारत असल्याने आई-वडील तिला रागवायचे.
मैत्रिणी होत्या बेपत्ता !
रागाच्या भरात गीतांजली माधुरीसह तीन दिवसांपासून बेपत्ता असल्याने घरच्यांकडून सर्वत्र तपास सुरू होता. परंतु दुर्दैवाने एका विहिरीत दोघींचा मृतदेह आढळून आल्याने त्यांच्या शेतकरी परिवारांवर मोठा आघात झाला आहे. माधुरीच्या पश्चात आई, वडील, दोन मोठे भाऊ, वहिनी, तर गीतांजलीच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक लहान बहीण असा परिवार आहे.
घटनेचा छडा लावू
तीन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या मुलींचे नेमके काय झाले. याची पोलिस तपासात सत्यता समोर येईल. घटनास्थळी चिठ्ठी वगैरे काही मिळाले नाही. परंतु वरिष्ठांच्या मार्गदर्शनात या घटनेचा छडा लावू !- नवनाथ रसाळ, पोलिस उपनिरीक्षक, अभोणा पोलिस ठाणे