miraj crime news: मिरजच्या टाकळी येथे उसाच्या शेतात सापडलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ उकललं. रेल्वे तिकिट व आर्थिक व्यवहाराच्या आधारे सांगली स्थानिक गुन्हे शाखेने दुसरा पती व सासऱ्याला हरियाणा व उत्तर प्रदेशातून अटक केली.
सांगली | आयर्विन टाइम्स प्रतिनिधी
सांगलीच्या मिरज तालुक्यातील टाकळी परिसरात उसाच्या शेतात छिन्नविच्छिन्न अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या हत्येचं गूढ अखेर उकललं असून, या प्रकरणी सांगली स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश मिळालं आहे. मयत महिलेचा दुसरा पती व सासऱ्याने मिळून तिची हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. या दोघांना अनुक्रमे हरियाणा व उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

टाकळी येथील उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मृतदेहाजवळ काही अंतरावर रेल्वे तिकीट सापडलं. महिलेची ओळख पूर्णतः पटलेली नसतानाही केवळ त्या रेल्वे तिकिटाच्या आधारे गुन्हे शाखेने तपासाची दिशा निश्चित केली आणि हत्येचा छडा लावला.
तपासात मयत महिलेची ओळख उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणारी नीतू उर्फ शालिनी यादव अशी पटली. तिचा दुसरा पती आकाश उर्फ विशाल दीनदयाळ यादव व सासरा दिनदयाळ रामबाली यादव यांनी मिळून तिची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
नीतू उर्फ शालिनी ही पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर जौनपूर येथील आकाश उर्फ विशाल याच्याशी तिची ओळख होऊन कुटुंबाची कल्पना न देता दोघांनी विवाह केला होता. मात्र, कुटुंबातील वाद वाढल्यानंतर नीतूने दुसऱ्या पतीविरोधात पोलीस तक्रार केली होती. याचा राग आकाशच्या मनात होता.
पत्नीकडून होत असलेला कथित त्रास व चारित्र्याविषयीच्या संशयातून आकाश उर्फ विशाल याने वडील दिनदयाळ यांना सोबत घेऊन १६ डिसेंबर २०२५ रोजी नीतूला जौनपूरहून रेल्वेने मिरज तालुक्यातील टाकळी येथे आणलं. येथे शॉलने गळा आवळून तिची हत्या करून दोघे पुन्हा रेल्वेने उत्तर प्रदेशात पळून गेले.
घटनास्थळी सापडलेलं रेल्वे तिकीट तसेच मिरज रेल्वे स्थानकाबाहेर चिक्की विक्रेत्याकडे केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या धाग्यांवरून स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींचा माग काढला. त्यानुसार आकाश उर्फ विशाल याला हरियाणामधून, तर दिनदयाळ यादव याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

