चव्हाण कुटुंब कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हुपरीचे चांदी व्यावसायिक
कोल्हापूर, (आयर्विन टाइम्स):
राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील शिवगंज-पाली राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील हुपरी येथील चव्हाण कुटुंबीयांची मोटार अपघातग्रस्त झाली. अपघातात बाबूराव नारायण चव्हाण (४९), त्यांची पत्नी सारिका (३८), मुलगी साक्षी (१९), आणि मुलगा संस्कार (१७) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आडव्या आलेल्या गायीला वाचविण्याच्या प्रयत्नात मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने झाला. मोटार उलटली आणि रस्त्याकडेच्या झाडावर जोरात धडकली.
हुपरी येथील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार बाबूराव चव्हाण गेल्या तीस वर्षांपासून येथे राहायला आहेत. कपिलेश्वर (ता. राधानगरी) हे त्यांचे मूळ गाव असून हुपरी तसेच तुरुंबे (ता. राधानगरी) येथे त्यांचा सोने-चांदी दागिन्यांचा व्यवसाय आहे. दिवाळीनंतर त्यांनी राजस्थानमधील प्रेक्षणीय तसेच धार्मिकस्थळी सहलीचा बेत आखला होता. त्यानुसार ते कुटुंबासह मंगळवारी (ता. १२) सकाळी कोल्हापूर (Kolhapur) मधून रेल्वेने राजस्थानमध्ये सहलीसाठी गेले होते. बाबूराव यांनी आपल्या कुटुंबीयांसह धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्याचा बेत आखला होता.
सोबत पट्टणकोडोलीमधील दोन नातेवाईकही होते. जोधपूरहून परतताना त्यांच्या गाडीसमोर अचानक गाय आली. तिचा बचाव करताना मोटारीचे नियंत्रण सुटले, आणि भीषण अपघात घडला.
असा घडला अपघात
सहलीसाठी गेलेल्या चांदी व्यापारी चव्हाण यांनी सिरोही येथील शिवगंज येथील ज्वेलर्स मित्र किशोर प्रजापत यांच्याकडे गेले होते. याच ज्वेलर्सकडून कार मागवून जोधपूरला गेले होते. गुरुवारी रात्री तेथून परतत असताना कारसमोर गाय आली. त्यामुळे गाडी चालवत असलेले बाबूराव यांचे नातेवाईक प्रमोद जैन घाबरले आणि गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्यापासून 50 फूट अंतरावर असलेल्या झाडात घुसली. परिसर सुनसान असल्याने सर्वजण गाडीत अडकून राहिले. राजस्थान येथील प्रसारमाध्यमांनुसार अर्धा तास झाला तरी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझावरून ना रुग्णवाहिका आली ना गस्ती पथकाच्या नजरेस पडल्या.
पोलिस पोहोचेपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला होता
अर्ध्या तासानंतर अपघाताची माहिती मिळताच पोलीस टोल पथकासह घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत कारमधील सहापैकी चौघांचा श्वास थांबला होता. या अपघातात बाबूराव यांच्यासह त्यांची पत्नी सारिका, मुलगी साक्षी आणि मुलगा संस्कार यांचा मृत्यू झाला होता. याशिवाय बाबूराव यांचा पुतण्या चिन्मय आणि कारचालक नातेवाईक प्रमोद जखमी झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी चौघांचेही मृतदेह संदेराव यांच्या शासकीय रुग्णालयातील शवागारात ठेवले आहेत. प्रमोद जैन यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पाली येथील बांगर रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
हे देखील वाचा: sangli crime news: सांगली पोलिसांची कारवाई: गुंड मोहम्मद नदाफ व 2 साथीदारांना अटक
हुपरीतील चांदी व्यवसायातील नावलौकिक
बाबूराव चव्हाण कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) हुपरी तील चांदी व्यावसायिक म्हणून ओळखले जात. मूलगाव कपिलेश्वर असलेल्या बाबूराव यांनी बहीण आनंदी आणि मेहुणे अशोक ससे यांच्या मदतीने चांदी व्यवसायात आपली ओळख निर्माण केली. त्यांनी मुलगा-मुलीला उत्तम शिक्षण देत भविष्यातील स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला होता. साक्षी एमबीए शिक्षण घेत होती, तर संस्कार अकरावीला होता. कुटुंबाने नुकताच एक प्लॉट खरेदी केला होता, जिथे त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न होते.
हुपरीतील शोकाकुल वातावरण
या दुर्दैवी घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) हुपरीसह संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे. राम-लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखले जाणारे बाबूराव व त्यांचे भाऊ दत्तात्रय हे सहलीबाबत उत्सुक होते. परंतु नियतीने चव्हाण कुटुंबावर काळाची झडप घालून कुटुंबाचा उदय असतानाच सर्व काही उद्ध्वस्त केले.