सारांश: जत तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून, एकजण गंभीर जखमी झाला आहे. जत-सांगली रस्त्यावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने शहाजान नदाफ ठार झाले, तर कुंभारीजवळ अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत शिवाजी कोळी यांचा मृत्यू झाला आणि विजय क्षीरसागर जखमी झाले. दोन्ही घटनांतील वाहनचालक फरार असून पोलिस तपास सुरू आहे.
जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन दुचाकीस्वारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनांनी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
पहिली घटना: जत-सांगली रस्ता
गुरुवारी रात्री जत-सांगली रस्त्यावर शहराजवळ क्रीडा संकुलाच्या परिसरात झालेल्या अपघातात शहाजान काशिम नदाफ (वय ४६, राहणार जत) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाजान नदाफ हे रात्री काम आटोपून आपल्या दुचाकी (एमएच १६-एस ७१०६) वरून घरी परतत होते. क्रीडा संकुलाजवळ मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एम एच १० झेड ०७९६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शहाजान गंभीर जखमी झाले आणि प्रचंड रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे.
दुसरी घटना: कुंभारी येथील अपघात
शुक्रवारी सायंकाळी सुमारे सव्वाचारच्या सुमारास कुंभारी गावाजवळील विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर अनोळखी वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने शिवाजी किसन कोळी (वय ३०, कुंभारी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर विजय संभाजी क्षीरसागर (वय २८) गंभीर जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी व विजय हे मोटारसायकलवरून (वाहन क्रमांक नोंद नसलेला) जतकडे जात असताना, मागून आलेल्या अनोळखी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी कोळी जागीच ठार झाले, तर विजय क्षीरसागर यांना तातडीने सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस तपास सुरू
दोन्ही घटनांमधील वाहनचालक फरार झाले असून, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांवरून तपास सुरू केला आहे. कुंभारी येथील अपघातस्थळी उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे; परंतु नेमका अपघात कोणत्या वाहनाने केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुरक्षेचा आभाव व वेगवान वाहनांचे संकट
या दुहेरी अपघातांमुळे जत तालुक्यातील रस्त्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून, संबंधित यंत्रणांकडून कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.