सारांश: इस्लामपूरच्या यल्लम्मा चौकात किरकोळ वादातून गौरव कुलकर्णी याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. जुबेर इनामदारसोबत मैत्री केल्याच्या रागातून सौरभ पाटील आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना उसाच्या फडात झटपटीनंतर अटक केली. या घटनेने शहरात खळबळ माजली असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
इस्लामपूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
किरकोळ वादाचे रूपांतर हत्याकांडात होऊन एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२७ जानेवारी) रात्री इस्लामपूरच्या यल्लम्मा चौकात घडली. जुबेर इनामदारसोबत फिरल्याच्या रागातून सौरभ पाटील व त्याच्या साथीदारांनी गौरव हेमंत कुलकर्णी (वय २४, रा. गणेश भाजी मंडईजवळ, इस्लामपूर) याचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला.
या प्रकरणी सराईत गुन्हेगार सौरभ सुशील पाटील, विजय धुलुगडे (दोघेही इस्लामपूर) आणि साजिद जहाँगीर इनामदार (रा. गोटखिंडी, ता. वाळवा) यांच्याविरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्यांना मध्यरात्री उसाच्या फडात रंगलेल्या झटापटीनंतर ताब्यात घेतले.
भांडणाचा रक्तरंजित शेवट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (२६ जानेवारी) गौरव त्याचा मित्र जुबेर इनामदारसोबत दुचाकीवर फिरत असताना सौरभ पाटील याने “तू जुबेरसोबत का फिरतोस?” असा जाब विचारला आणि त्याला धमकी दिली. दुसऱ्या दिवशी गौरव व त्याचा मित्र प्रतीक कामतगी यांची यल्लम्मा चौकात भेट झाली. त्याच वेळी सौरभने गौरवला बोलवून घेतले.
थोड्याच वेळात सौरभ पाटील, साजिद इनामदार आणि विजय धुलुगडे दुचाकीवरून तेथे आले. सौरभने गौरवच्या खांद्यावर हात ठेवत त्याला बाजूला नेले. इतर दोघेही त्याच्या पाठोपाठ गेले. अचानक गौरव जोरात ओरडू लागला— “मला सोडा, मी परत जुबेरसोबत फिरणार नाही, मला मारू नका!”
प्रतीकने मध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सौरभने त्याला झिडकारत “तुला लय मस्ती आली आहे, याला संपवायचं आहे” असे म्हणत शिवीगाळ केली. साजिद आणि विजयने गौरवला धरून ठेवले आणि सौरभने धारदार चाकूने त्याच्या पोटात भोसकले. गंभीर जखमी झालेल्या गौरवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
गौरवचा हकनाक बळी
गौरव हा छायाचित्रकार होता. त्याचे वडील पौरोहित्य आणि इस्त्री व्यवसाय करत असून आई शिकवणी घेतात. गौरवला जुळा भाऊ असून तो पुण्यात नोकरीला आहे. गौरवचा कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभाग नव्हता, मात्र जुबेरसोबत मैत्री केल्याच्या कारणावरून त्याचा बळी गेला.
सौरभ पाटील याच्यावर इस्लामपूर आणि इचलकरंजी येथे खुनाचे गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर होता. त्याने जुबेर इनामदारसोबत झालेल्या भांडणाचा राग गौरववर काढला आणि त्याचा निर्दयीपणे खून केला.
पोलिसांची धडक कारवाई: उसाच्या फडात झटापट
गौरवचा खून केल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले. पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रात्रीच त्यांचा शोध सुरू केला. कामेरी रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात पोलिस आणि आरोपी यांच्यात झटापट झाली. या कारवाईत पोलिस निरीक्षक संजय हारुगडे आणि त्यांच्या सहकाऱ्याला दुखापत झाली.
विशेष म्हणजे, आरोपींना पकडल्यावर त्यांना घटनास्थळी चालत नेत पोलिसांनी परिसरात एकप्रकारे जनजागृती केली.
या हत्याकांडामुळे इस्लामपूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. एका क्षुल्लक वादातून निर्दोष तरुणाचा बळी गेला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना गजाआड केले असले तरी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.