सारांश: पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ भीषण अपघातात आयशर टेम्पो, मॅक्झिमो गाडी, आणि एसटी बसची टक्कर होऊन 9 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले आहेत. ओव्हरटेकच्या प्रयत्नामुळे मॅक्झिमो गाडीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.
पुणे, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ मुक्ताई ढाब्यानजीक आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी आहेत. आयशर टेम्पो, प्रवासी मॅक्झिमो गाडी आणि एसटी बसच्या तिहेरी अपघाताने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. मृतांमध्ये एका शिक्षिकेसह कामगार आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.
घटनाक्रम:
प्रत्यक्षदर्शींनुसार, आयशर टेम्पो ओव्हरटेक करत असताना मॅक्झिमोला जोरदार धडक दिली. परिणामी, मॅक्झिमो गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली. अपघातामुळे मॅक्झिमोचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मृत व जखमींची माहिती:
अपघातात मॅक्झिमोतील 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान आणखी 3 जण दगावले. मृतांमध्ये आनंदवाडी शाळेतील शिक्षिका मनीषा पाचरणे, स्पर्धा परीक्षा तयारी करणारा युवक युवराज वाव्हळ, तसेच लहानगी वशिफा इनामदार यांचा समावेश आहे. जखमींना नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
या अपघातात पुणे जिल्ह्यातील देबुबाई दामू टाकळकर (वय ६५ वर्षे रा. वैशखखेडे तालुका जुन्नर), विनोद केरूभाऊ रोकडे (५० वर्षे, रा. कांदळी, जुन्नर , युवराज महादेव वाव्हळ ( वय २३ वर्षे रा. १४ नंबर कांदळी, ता. जुन्नर), चंद्रकांत कारभारी गुंजाळ (वय ५७ वर्षे, रा. कांदळी, ता. जुन्नर , गीता बाबुराव गवारे (वय ४५ वर्षे १४ नंबर कांदळी ता. जुन्नर) , भाऊ रभाजी बढे (वय ६५ वर्षे रा. नगदवाडी कांदळी, ता. जुन्नर) , नजमा अहमद हनीफ शेख (वय ३५ वर्षे रा.गडही मैदान, खेड राजगुरुनगर )
तसेच लहानगी वशिफा वशिम इनामदार (वय ५ वर्षे) , शिक्षिका मनीषा नानासाहेब पाचरणे (वय ५६ वर्षे, रा.१४ नंबर कांदळी जुन्नर) यांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे.
ओव्हरटेकचा मोह आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक:
अपघाताचे कारण ओव्हरटेकचा मोह आणि मॅक्झिमोमध्ये ठासून भरलेले प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक ही ग्रामीण भागातील मोठी समस्या आहे. वेळेत एसटी बस उपलब्ध नसल्याने अशा वाहनांवर नागरिक अवलंबून असतात.
पोलीस तपास सुरू:
घटनास्थळी पोलीस पोहोचले असून अपघाताचा तपास सुरू आहे. महामार्गावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
अपघाताने उभे केलेले प्रश्न:
या दुर्घटनेने बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीचा आणि महामार्ग सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे. सरकारी पातळीवर या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
(This news has also been based on reports from various media outlets.)