सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. आटपाडीत मुख्याधिकाऱ्यांच्या घरात चोरी झाली, तर देववाडीत पाणीवाटपाच्या वादातून दोन गटांत मारामारी झाली. नागज येथे वृद्धेचा विहिरीत पडून मृत्यू झाला, तर घोरपडी येथे एका व्यक्तीने आत्महत्या केली. कडेगाव बसस्थानकात महिलेच्या गंठण चोरीप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या घरात चोरी; 70 हजारांचे दागिने गायब
आटपाडी, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील आटपाडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी वैभव हजारे यांच्या बंद घरात चोरट्यांनी चोरी करून ७० हजार रुपयांचे दागिने लंपास केले. तसेच शेजारील बंद घरातही चोरी झाल्याची नोंद आटपाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी हजारे हे पत्नीसह भाड्याच्या घरात राहत होते. २७ डिसेंबर रोजी कामानिमित्त ते केडगाव (जि. अहिल्यानगर) येथे गेले असता, घराला कुलूप लावण्यात आले होते. दरम्यान, मध्यरात्री चोरट्यांनी घरातील कपाट तोडून २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरले. यामध्ये कानातील झुंबे आणि दोन अंगठ्या यांचा समावेश आहे. शेजारील सचिन तवटे यांच्या घरातही चोरी झाली असून चोरीला गेलेल्या वस्तूंचा तपशील पोलिसांनी नोंदवलेला नाही.
देववाडीत दोन गटांत वाद, पोलिसांत गुन्हा दाखल
शिराळा, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील देववाडी (ता. शिराळा) येथे पाणीवाटपाच्या वादातून दोन गटांमध्ये वाद होऊन मारहाणीचा प्रकार घडला. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून गुन्हा शिराळा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण खोत यांनी रघुनाथ खोत यांच्या शेतात पाणी गेल्यामुळे शेताची हद्द ठरवण्याबाबत वाद निर्माण केला. यावेळी रघुनाथ खोत यांनी नारायण यांना धक्काबुक्की केली, तर त्यांच्या मुलाने काठीने मारहाण केली. दुसरीकडे, रघुनाथ खोत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नारायण खोत व त्यांच्या मुलाने रघुनाथ यांना काठीने मारहाण केली. दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.
विहिरीत पडून वृद्धेचा मृत्यू
ढालगाव,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):सांगली जिल्ह्यातील नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील ६५ वर्षीय रंजना भगत या सामाईक विहिरीत पडून मृत झाल्याची घटना घडली. पोलिस पाटील दीपक शिंदे यांनी याची माहिती पोलिसांना दिली असून पुढील तपास सुरू आहे.
घोरपडी येथे गळफास घेऊन आत्महत्या
ढालगाव, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):सांगली जिल्ह्यातील घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथील उत्तम भगवान कोकरे (वय ४५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तम कोकरे यांना दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
कडेगाव बसस्थानकात सोनसाखळी चोरी, दोन संशयितांना अटक
कडेगाव, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील कडेगाव बसस्थानकात १६ डिसेंबर रोजी एका महिलेच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीचे गंठण चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली. पोलिसांनी तपास करून श्रावण कांबळे (वय ३३) व एका महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी सोनताटे या महिलेकडून चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपींना पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे.