सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपची जोरदार तयारी, चंद्रकांत पाटील यांची रणनीती, काँग्रेसमधील फोडाफोड आणि जयंत पाटील, विशाल पाटील, विश्वजित कदम एकत्र आल्याने निर्माण झालेली काट्याची राजकीय लढाई – सविस्तर विश्लेषण.
सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेली नाही. ही निवडणूक आता संपूर्ण सांगली जिल्ह्याची राजकीय दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपची भक्कम तयारी, वाढलेली संघटनात्मक ताकद आणि दुसरीकडे विरोधकांतील एकजूट यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान सांगली महापालिका निवडणूक महाविकास आघाडी ताकदीने लढवणार असल्याचे विश्वजित कदम, जयंत पाटील आणि विशाल पाटील यांनी संयुक्तपणे घोषणा केली आहे. भाजप विरोधात विरोधक एकवटल्याने काट्याची लढाई अपेक्षित आहे.
दीर्घकाळ चर्चेत असलेल्या आणि प्रतीक्षेचा विषय ठरलेल्या महापालिका निवडणुकांची अखेर अधिकृत घोषणा झाली आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच, आज १५ डिसेंबर रोजी निवडणूक आयोगाने मनपा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. पुढील अवघ्या एका महिन्यात राजकीय वातावरण तापणार असून निवडणुकीचा जोर वाढणार आहे.
१६ जानेवारीपासून प्रशासकीय कारभाराखाली असलेल्या महानगरपालिकांना नवे लोकप्रतिनिधी मिळणार आहेत. राज्यातील मुदत संपलेल्या सांगली, कोल्हापूरसह २७ महानगरपालिका तसेच नव्याने स्थापन झालेल्या जालना व इचलकरंजी महापालिकांसाठी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
लोकसभा निकालाने पालटलेले राजकीय गणित

मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. सुरुवातीला ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. भाजपचे संजय पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता. महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारीही दिली नव्हती. मात्र, राजकारणात अनपेक्षित घडामोडी कधीही घडू शकतात, याचा प्रत्यय देत अपक्ष विशाल पाटील खासदार झाले.
या निकालाचा सर्वाधिक प्रभाव सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात दिसून आला. या भागात विशाल पाटील यांनी मोठी आघाडी घेतली. त्यामुळे काँग्रेसला जिल्हाभर नवे बळ मिळाले, तर भाजपच्या छावणीत काही काळ शांतता पसरली होती. त्याच काळात जर महापालिकेची निवडणूक झाली असती, तर काँग्रेस आणि विरोधकांना मोठा लाभ झाला असता, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे पुनरागमन
महापालिका निवडणूक लांबणीवर पडली आणि त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीत सांगली आणि मिरज या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. सांगली–मिरज परिसरात भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्याने भाजपच्या छावणीत पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याच दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उबाठा) हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष बॅकफूटवर गेले. मात्र, भाजपने या विजयावर समाधान न मानता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका निवडणुकीची तयारी सातत्याने सुरू ठेवली.

२०१८ च्या निवडणुकीचा इतिहास आणि आकडे
२०१८ च्या सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीत एकूण ७८ जागांपैकी भाजपने ४१ जागा जिंकून काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतली होती. काँग्रेसला २०, राष्ट्रवादीला १५ तर अपक्षांना २ जागा मिळाल्या होत्या.
The much-discussed and long-awaited municipal corporation elections have finally been announced. Just a day after the conclusion of the winter session of the Legislative Assembly, the Election Commission on 15 December declared the municipal polls.
Within the next month, the political campaign will gather momentum. From 16 January, the long-awaited municipal corporations will get new administrations. Voting will be held simultaneously for 27 municipal corporations whose terms have expired, as well as for the newly formed Jalna and Ichalkaranji municipal corporations.
मतांच्या आकडेवारीनुसार भाजपला सुमारे ३ लाख ६३ हजार मते मिळाली होती, तर काँग्रेसला २ लाख १३ हजारांहून अधिक आणि राष्ट्रवादीला १ लाख ६१ हजारांहून अधिक मते मिळाली होती. या महापालिकेवर १९९८ ते २००३ काँग्रेस, त्यानंतर राष्ट्रवादी आणि पुन्हा काँग्रेस अशी सत्तांतराची मालिका झाली. २०१८ ते २०२३ हा कालावधी भाजपच्या सत्तेचा होता. गेली दोन वर्षे मात्र प्रशासक राज सुरू आहे.

भाजपची रणनीती : फोडाफोड आणि संघटन बळ
या निवडणुकीत सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. काँग्रेसमधील फोडाफोडी करून भाजपची फौज अधिक मजबूत करण्यात आली आहे. जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश, महापालिका क्षेत्रात मदनभाऊ गटाची ताकद आणि काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश यामुळे काँग्रेस कमकुवत झाली आहे.
त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या निमित्ताने खासदार विशाल पाटील यांनी सांगली–मिरजमधील भाजप आमदारांशी आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी जपलेला राजकीय स्नेहबंध अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा सलोखा वसंतदादा घराण्याचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना शह देण्यासाठी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

विरोधकांची संभाव्य एकजूट : लढतीचे भवितव्य ठरवणारा मुद्दा
वसंतदादा आणि राजारामबापू घराण्यांतील जुना राजकीय संघर्ष आजही दुसऱ्या-तिसऱ्या पिढीत सुरू आहे. याच संघर्षाचा लाभ भाजपने आतापर्यंत अनेक निवडणुकांत घेतला आहे. भाजपचा विस्तार वाढत गेला आणि काँग्रेसबरोबरच राष्ट्रवादीही कमकुवत होत गेली.
मात्र, या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो—राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम हे तिन्ही नेते तन, मन, धनाने एकत्र येणार का? जर हे तिन्ही नेते एकत्र आले, तर भाजपसाठी ही निवडणूक निश्चितच काट्याची ठरू शकते.
भाजपसमोरील अंतर्गत आव्हाने
महापालिका क्षेत्रात भाजप सध्या भक्कम असला, तरी पक्षांतर्गत गट-तट वाढले आहेत. नेते आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढली असली, तरी त्यांना एकसंध ठेवणे हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. याच पार्श्वभूमीवर मिरजेत शहर जिल्हा भाजप कोअर कमिटीची बैठक घेऊन पक्षाची बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. ही बांधबंदिस्ती किती प्रभावी ठरते, हे प्रत्यक्ष निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.

निष्कर्ष
सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणूक ही भाजपसाठी सत्ता टिकवण्याची, तर विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. भाजपची तयारी भक्कम आहे, फौज तगडी आहे; मात्र विरोधक एकवटल्याने ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि काट्याची ठरेल. त्यामुळे येणाऱ्या काळात कोण कोणाबरोबर जातो, कोण वेगळा राहतो आणि मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
