क्राईम / रहस्यमय स्टोरी

चोरी झालेल्या शेळ्या-बोकडांची किंमत दीड लाखांच्या आसपास

आयर्विन टाइम्स | जत
जत तालुक्यातील जालिहाळ खुर्द येथे शनिवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजवली आहे. तलवारीच्या धाकाने १३ शेळ्या-बोकडांची चोरी करण्यात आली. हरिबा निवृत्ती जावीर या स्थानिक पशुपालकाच्या कळपातून या शेळ्या-बोकडांची चोरी करण्यात आली असून चोरीला गेलेल्या शेळ्या-बोकडांची अंदाजे किंमत दीड लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

शेळ्या-बोकडांची
चित्र प्रतीकात्मक आहे

कसलीही भीती न बाळगता भरदिवसा चोरी

शनिवारी दुपारी जवळपास दीड वाजता, पाच जणांची टोळी विना क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून आली. त्यांनी हरिबा जावीर यांना तलवारीचा धाक दाखवून कळपातील शेळ्या आणि बोकडांना गाडीजवळ आणण्यासाठी गहू आणि मका टाकला. शेळ्या-बोकडे खाण्यासाठी एकत्र आले, तेव्हा तीन बोकड, सहा शेळ्या आणि चार पिल्लांना गाडीत टाकून चोरटे विजापूरच्या दिशेने पसार झाले. हा संपूर्ण प्रकार अवघ्या दहा मिनिटांत घडला.

हे देखील वाचा: crime news : नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अखेर पोलिसांनी केली अटक; चार पथकांनी 23 ठिकाणच्या 125 फुटेजची केली तपासणी

घटनास्थळी तपासाची हालचाल

घडलेल्या घटनेने जावीर आणि त्यांचे कुटुंबीय पुरते घाबरून गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ आणि जावीर यांचा मुलगा संभाजी यांनी तातडीने जवळच्या तिकोटा तालुक्यातील घोणसंगी ( जि. विजापूर- कर्नाटक) येथील चौकात सीसीटीव्ही तपासणी केली. त्यात गाडी विजापूरच्या दिशेने जात असल्याचे आढळून आले. उमदी पोलिसांना याची माहिती दिली असता हवालदार संजय पांढरे यांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला.

हे देखील वाचा: sangli crime news: सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार ओरिसातून जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण कारवाई

चोरीची पद्धत आणि पूर्वीचे प्रकार

जावीर यांचे शेळ्या-मेंढ्यांचे चरावयाचे ठिकाण गावाच्या दक्षिण बाजूस असलेल्या गायरानाजवळ आहे. या चोरीसाठी टेहळणी करूनच चोरट्यांनी हल्ला केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही जत तालुक्यात अशा प्रकारे कळपातून शेळ्या-बोकडांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, असे स्थानिकांनी सांगितले.

पशुपालकांत भीतीचे वातावरण

भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे जालिहाळ खुर्द आणि आसपासच्या गावांतील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः पूर्व भागातील शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या प्रमाणात शेळ्या-मेंढ्यांच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे या चोरीमुळे कळपांचे संरक्षण कसे करायचे, हा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे.

या धक्कादायक घटनेचा उमदी पोलिसांकडून तपास सुरू असून अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

हे देखील वाचा: crime news: बंद हॉटेलमधील साहित्य चोरी करणारे सराईत चोरटे जेरबंद; 1 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *