मराठा

लग्न म्हणजे दोन कुटुंबांच्या संस्कृतींचं एकत्र येणं, जीवनाची नवी सुरूवात. पण सध्या या आनंददायी समारंभाचा खर्च काहीसा विकृतीच्या पातळीवर जाऊ लागला आहे. डीजे, प्री-वेडिंग शूट, थाटामाटाचे सत्कार, हजारोंच्या गर्दीत होणाऱ्या लग्नांमुळे अनेक कुटुंब आर्थिकदृष्ट्या डबघाईला येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर येथे रविवारी पार पडलेल्या महत्त्वपूर्ण सभेत मराठा समाजाने विवाह समारंभांसाठी २० कलमी आचारसंहिता जाहीर केली.

मराठा

ही आचारसंहिता म्हणजे केवळ नियमांची यादी नव्हे, तर एक सामाजिक जाणीव, शाश्वततेचा विचार आणि निरर्थक प्रदर्शनांना थांबवण्याची सामूहिक इच्छा. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी उफाळून आलेल्या हुंडा प्रथेच्या प्रश्नाने या चळवळीला बळ दिलं. लग्नातली स्पर्धा, स्टेटस दाखवण्याची मानसिकता, गरजेपेक्षा जास्त खर्च – यावर खरंच आता मराठा समाजाने विचार करणं गरजेचं झालं आहे.

शपथ घेतलेली बदलाची वाट

अहिल्यानगर येथे भरलेल्या या संमेलनात संत, समाजसेवक, राजकारणी, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले. डोंगरगणचे जंगले शास्त्री महाराज, देवगडचे भास्करगिरी महाराज, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप, सर्जेराव निमसे, एन. बी. धुमाळ, साहेबराव दरेकर आणि इतरांनी उपस्थित राहून मराठा समाजाला नवा मार्ग दाखवला. या वेळी “विवाह समारंभात अनाठायी खर्चावर मर्यादा आणि शुचितेचा आग्रह” या भूमिकेवर सर्वांचे एकमत झाले.

आचारसंहितेचे ठळक मुद्दे

ही आचारसंहिता प्रत्येक वधू-वर पक्षासाठी लागू असून खालील मुख्य नियम त्यात आहेत:

* हुंड्याला स्पष्ट नकार : कोणत्याही स्वरूपात हुंडा घेणे-देणे वर्ज्य.
* प्री-वेडिंग शूटला रामराम : फोटोग्राफी केवळ साधेपणाने करावी, फिजूल खर्च टाळावा.
* डीजे, बँडबाजा वर्ज्य : पारंपरिक वाद्ये आणि लोककलावंतांना प्राधान्य.
* महोत्सवी सत्कार बंद : सत्कार, भाषणांचा ढोल न वाजवता सोहळा साधेपणाने साजरा करावा.
* वरमाला उचलणे निषिद्ध : नवरादुल्ह्यांना उचलण्याच्या हास्यास्पद आणि अपायकारक प्रकारांना थांबवावे.
* दारू व नाचगाणी वर्ज्य : दारू पिऊन नाचणाऱ्यांना प्रतिबंध.
* फेटा फक्त वडिलांना : वर आणि वधूचे वडीलच फेटा बांधणार.
* ५०० लोकांची मर्यादा : विवाह सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच.
* कर्ज घेऊन खर्च टाळा : लग्नासाठी कर्ज घेणे टाळावे.
* लग्नानंतर हस्तक्षेप नाही : नवविवाहित दांपत्याच्या जीवनात अति-हस्तक्षेप टाळावा.

मराठा

समाजाच्या सशक्तीकरणाची दिशा

या आचारसंहितेच्या माध्यमातून एक नवा सामाजिक संदेश दिला जात आहे – “साधेपणातच सौंदर्य आहे.” लग्नाच्या नावाखाली दागिने, गाड्यांच्या चाव्या, महागड्या भेटवस्तू देण्याची स्पर्धा थांबवण्याचा निर्धार यातून दिसतो.

ह.भ.प. जंगले शास्त्री महाराज यांनी स्पष्टपणे सांगितले की, “लग्नासारख्या पवित्र समारंभात चुकीच्या प्रथा शिरकत आहेत. त्याला आळा घालायचा असल्यास मराठा समाजानेच पावले उचलली पाहिजेत.” पुस्तकं, रोपे, किंवा रोख रक्कम यासारख्या अर्थपूर्ण भेटी अहेरासाठी सुचवण्यात आल्या आहेत.

हेदेखील वाचा: Reflection: युवक, शेती आणि आपले भविष्य : ‘विकसित भारत’ घडवायचा असेल, तर ‘विकसित खेडे’ घडवावं लागेल

हुंडा : अजूनही समाजाला पोखरणारी कीड

वैष्णवी हगवणे प्रकरणात स्पष्ट दिसून आले की, शिक्षित असूनही आज अनेक मुलींना फक्त हुंड्याच्या मागणीमुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. कायद्याने बंदी असूनही, हुंड्याचे वेगवेगळे प्रकार समाजात अस्तित्वात आहेत – दागिने, गाड्या, रोकड, घरखरेदी इत्यादी. त्यामुळे या आचारसंहितेमुळे केवळ खर्चच नव्हे, तर हुंड्याच्या चुकीच्या मानसिकतेलाही तडा जाण्याची आशा निर्माण झाली आहे.

मराठा
छायाचित्रे प्रतीकात्मक आहेत

सामूहिक जबाबदारीची गरज

या आचारसंहितेचा प्रभाव टिकवण्यासाठी मराठा समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. हे फक्त मराठा समाजापुरते मर्यादित न राहता इतर समाजांनीही या दिशेने विचार करावा. जर प्रत्येक कुटुंबाने या नियमांचं पालन केलं, तर विवाह सोहळे केवळ प्रदर्शन न राहता खऱ्या अर्थाने सामाजिक समरसतेचं प्रतीक ठरतील.

लग्न म्हणजे दोन जीवांचं, दोन कुटुंबांचं मिलन. त्यात साधेपणा, मोकळेपणा, आणि एकमेकांप्रती आदर असेल, तर ते दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्याचं बीज बनू शकतं. मराठा समाजाने घेतलेला हा पुढाकार इतर समाजांसाठीही आदर्श ठरेल, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

आता वेळ आहे, समारंभाच्या थाटामाटाऐवजी संस्कार आणि सहजीवनाच्या मूल्यांवर भर देण्याची!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *