सारांश: नागपूरच्या कपिलनगर परिसरात उत्कर्ष डाखोळे या २४ वर्षीय तरुणाने शिक्षणावरील वादातून आई-वडिलांची निर्घृण हत्या केली. आईचा गळा आवळून व वडिलांचा चाकूने वार करून खून करण्यात आला. घटना उघडकीस येऊ नये म्हणून त्याने पुरावा लपवण्याचा प्रयत्न केला. पोलिस तपासानंतर उत्कर्षने गुन्ह्याची कबुली दिली.
नागपूर, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
शहराला हादरवून सोडणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश बुधवारी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खसाळा येथे झाला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या उत्कर्ष डाखोळे (२४) याने रागाच्या भरात आपल्या आई-वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. या दुर्दैवी घटनेत लीलाधर डाखोळे (५०) आणि अरुणा डाखोळे (४३) या पती-पत्नींचा मृत्यू झाला.
घटनेचा तपशील
अरुणा डाखोळे या विनोबा भावेनगर येथील एका शाळेत शिक्षिका होत्या, तर लीलाधर डाखोळे हे कोराडी वीज केंद्रात टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. त्यांना दोन अपत्ये, उत्कर्ष आणि सेजल, असून उत्कर्ष यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. मात्र, गेल्या सहा वर्षांत वारंवार नापास होण्यामुळे त्याला आई-वडिलांकडून शिक्षण सोडून शेती करण्यासाठी दबाव टाकला जात होता.
२५ डिसेंबर रोजी वडिलांनी उत्कर्षला मारहाण केली आणि इंजिनिअरिंग सोडून शेतीत लक्ष घालण्यास सांगितले. यामुळे मनात असलेल्या हीन भावनेमुळे तो अधिकच अस्वस्थ झाला होता.
हत्येचा क्रम
२६ डिसेंबर रोजी, अरुणा डाखोळे पेपर तपासण्यात व्यस्त असताना उत्कर्षने पाठीमागून जाऊन तिचा गळा आवळून खून केला. तासाभराने वडील लीलाधर घरी परतले. ते सोप्यावर बसले असताना त्याने पाठीमागून जाऊन त्यांच्या मानेवर चाकूने वार करून त्यांचा देखील खून केला. दोन्ही मृतदेह घरात ठेवून उत्कर्ष घटनास्थळावरून निघून गेला.
पुरावा लपविण्याचा प्रयत्न
घटनेच्या दिवशी सेजल कॉलेजला गेली होती. तिला काही कळू नये म्हणून उत्कर्षने तिला तिचे कॉलेज सुटल्यावर तिला थेट बैलवाडा येथील काकांच्या घरी नेले. घर बंद असल्याने आणि आई-वडिलांचे मोबाईल त्याच्याजवळ असल्याने तो शंका निर्माण होऊ देत नव्हता. आई-वडिल ध्यानसाधनेसाठी बेंगळुरूला गेल्याचे त्याने बहिणीला खोटे सांगितले.
घटना कशी उघडकीस आली?
लीलाधर यांचा एक मित्र त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. घटनास्थळी येणाऱ्या दुर्गंधीमुळे लीलाधर यांच्या मित्राने शेजाऱ्यांना याची माहिती दिली. तिथेल्या लोकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, त्यांना मृतदेह आढळले. लीलाधर यांची दोन्ही मुले त्यांच्या काकांकडे गेल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही भावंडांना चौकशीसाठी आणले असता उत्कर्षने खुनाची कबुली दिली. उत्कर्षाच्या संशयास्पद वागण्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यावर खुनाचा उलघडा झाला.
पोलिस तपास सुरू
पोलिसांनी उत्कर्षविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून घटनेचा अधिक तपशील काढला जात आहे. या घटनेमुळे नागपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.