तलाठी खूनप्रकरणी संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती
आयर्विन टाइम्स / हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजेबुवा (ता. वसमत ) येथील तलाठी कार्यालयात फेरफार प्रलंबित असल्याच्या कारणावरून डोळ्यात मिरची पावडर टाकून चाकूने भोसकून तलाठ्याचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (ता. २८) घडली. संतोष पवार असे या तलाठ्याचे नाव असून, संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष पवार हे तलाठी म्हणून आडगाव रंजेबुवा व बोरी सावंत येथे काम पाहात होते. नेहमीप्रमाणे आज ते आडगाव रंजेबुवा सज्जाच्या कार्यालयात कामकाज करीत होते, त्यावेळी बोरी सावंत येथील एक तरुण दुचाकीने कार्यालयात आला. त्याने तलाठी पवार यांच्याशी फेरफारवरून बाचाबाची सुरू केली. काही कळण्याच्या आतच तरुणाने तलाठी पवार यांना चाकूने भोसकले.
संतोष पवार यांच्या पोटात आणि मांडीवर चाकूने वार करण्यात आले. अतिरक्तस्त्रावाने ते जागेवरच कोसळले. त्यानंतर हल्लेखोर तरुण दुचाकीने पसार झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आरडाओरडा सुरू झाल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी तलाठी पवार यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह हट्टा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. प्रलंबित कामावरून हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता असली तरी नेमके कारण समोर आले नाही. तलाठी पवार यांच्या टेबलवर मिरची पूड पडलेली होती. संशयितास ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
दरम्यान , तलाठी खून प्रकरणी राज्यात महसूल कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी खून प्रकरणातील आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, हिंगोली येथील आडगाव रंजे येथे तलाठी कार्यालयात एका तलाठ्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ राज्य तलाठी व मंडळ अधिकारी समन्वय संघाने कामबंद आदोलन पुकारले आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी संघांनी आंदोलनात सहभाग घेतला. अचानक करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे तलाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांना माघारी जावे लागले.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तलाठी संघांचे आंदोलन
आडगांव रंजे येथे संतोष पवार हे तलाठी कार्यालयात शासकीय कामकाज करत असताना भरदिवसा त्यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील तलाठी संघटनांनी सहभागी होऊन आंदोलन केले. अचानक आंदोलन केल्यामुळे तलाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांना परत जावे लागले.
आडगांव रंजे येथे संतोष पवार तलाठी कार्यालयात शासकीय काम करत असताना भरदिवसा त्यांच्यावर चाकूने हल्ला करून खून करण्यात आला.या घटनेचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. मृत संतोष पवार यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. तलाठ्यांचा कोणताही दोष नसतानाही केवळ संशयावरून एका कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला.
या घटनेमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनांनी आज एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, नायब तहसीलदार, आणि तहसीलदार यांनी कामबंद आंदोलनात सहभागी होऊन आंदोलन यशस्वी केले. रत्नागिरी जिल्ह्यासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथेही महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याचे वृत्त आहे.