सारांश: १३ वर्षांशी घरातून पळून मुंबईला आलेल्या जयराम बानन यांनी भांडी धुण्यापासून सुरुवात करत, प्रचंड मेहनतीने ‘सागर रत्ना’सारखा ३०० कोटींचा ब्रँड उभारला. त्यांच्या जीवनातील संघर्ष, अपयश आणि चिकाटी ही युवकांसाठी प्रेरणादायक ठरते. त्यांनी दाखवून दिलं की, परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनतीने यश मिळवता येतं. जयराम यांची कहाणी स्वप्नांना सत्यात उतरवण्याचा आदर्श मार्गदर्शक आहे.
“मंज़िल मिल ही जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो हैं जो घर से निकले ही नहीं…” (“मंजिल मिळेलच, भले उशीराने का होईना; पण चुकलेले तेच असतात, जे घरातून निघालेच नाहीत…”)
उर्दू शायर मिर्झा गालिब यांची ही ओळ केवळ कविता नाही, तर एका अशा माणसाच्या आयुष्याची खरीखुरी झलक आहे, ज्याने परिस्थितीच्या तोंडावर विश्वासाने आणि कष्टाच्या घामाने यशाचं दार उघडलं.
कोण म्हणालं की गरीब घरातून आलेली, शिकण्यात रस नसलेली मुलं यशस्वी होऊ शकत नाहीत?
१३ वर्षांचा एक मुलगा, ज्याला वडिलांचा राग, मारहाण आणि शालेय अपयश यांच्यामुळे घरातून पळ काढावा लागला, तोच मुलगा पुढे जाऊन ३०० कोटींच्या व्यवसायाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवेल, हे कोणालाच वाटलं नव्हतं. पण ही गोष्ट आहे ‘सागर रत्ना’ रेस्टॉरंट साखळीचे संस्थापक – जयराम बानन यांची.
कठीण सुरुवातीचं सामर्थ्यात रूपांतर
जयराम यांचा जन्म कर्नाटकातील उडुपी जवळ, एका अतिशय साध्या, शिस्तबद्ध कुटुंबात झाला. वडील चालकाची नोकरी करत होते. घरात शिस्त होती, पण प्रेमाच्या कमतरतेमुळे जयराम यांचे बालपण कठोर अनुभवांनी भरलेले होते. शाळेतील अपयश, वडिलांचा राग, मारहाण – हे सारे त्यांचं बालपण कुरतडत होते. एकदा तर वडिलांनी डोळ्यांत मिरची पूड टाकून शिक्षा केली होती.
शेवटी १३ वर्षांची कोवळी वय आणि डोळ्यांतून वाहणारे अश्रू – या दोन्ही गोष्टी घेऊन जयराम घरातून बाहेर पडले. वडिलांच्या पाकिटातून थोडेसे पैसे घेतले आणि मुंबईच्या दिशेने रेल्वेने प्रवास सुरू केला. हा प्रवास केवळ शहराचा नव्हता, तो स्वाभिमानाचा, संघर्षाचा आणि यशाच्या दिशेने सुरू झालेला पहिला टप्पा होता.
ज्याच्याकडे अनुभव नव्हता, त्याने भांडी घासून सुरुवात केली
मुंबईत आल्यानंतर जयराम यांना एका कँटीनमध्ये नोकरी मिळाली – तीही भांडी धुण्याची.तेव्हा पगार होता फक्त १८ रुपये. तेव्हाही त्यांनी परिस्थितीवर कुरकूर केली नाही. तक्रार न करता, लाज न बाळगता त्यांनी प्रामाणिकपणे काम सुरू ठेवलं.
छोट्या छोट्या गोष्टी शिकत, सहा वर्षांत ते वेटर झाले आणि मग मॅनेजर. पगारही वाढून २०० रुपये झाला. पण त्यांचं स्वप्न फक्त पगारात वाढ नव्हतं, त्यांना स्वतःचं काहीतरी ‘मोठं’ उभं करायचं होतं.
गाजियाबाद ते दिल्ली – एका ब्रँडची पायाभरणी
उद्योगक्षेत्रात पाऊल ठेवताना त्यांनी गाजियाबादमधील एका कँटीनचा टेंडर घेतला. अनुभव मिळवला. त्यानंतर काही बचत आणि मित्रांकडून घेतलेली मदत याच्या जोरावर साउथ दिल्लीतील एका कोपऱ्यात ‘सागर’ नावाचं लहानसं रेस्टॉरंट सुरू केलं.
साउथ इंडियन खाद्यसंस्कृती उत्तरेत विशेषशी परिचित नव्हती, पण जयराम यांची चव, गुणवत्ता आणि सेवाभाव लोकांच्या मनात घर करून गेला.
नंतर त्यांनी दुसरं रेस्टॉरंट लोधी मार्केटमध्ये सुरू केलं आणि नावात ‘रत्न’ जोडलं – सागर रत्ना. आज हे नाव एक ब्रँड बनलं आहे.
डोशाचा राजा – एक मानाचा किताब
आज जयराम बानन यांच्या नावाने भारतातच नव्हे, तर विदेशातही अनेक आउटलेट्स आहेत. “उत्तर भारतातील डोसा किंग” म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची यशोगाथा ही केवळ व्यावसायिक प्रवास नाही, ती आहे माणसाच्या असामान्य इच्छाशक्तीची, अडथळ्यांवर मात करणाऱ्या मनोबलाची आणि कष्टांची शर्थ गाठणाऱ्या यशाची.
युवकांसाठी शिकवण – ध्येयाने पेटलेलं मनच यशस्वी होतं
✅ आव्हाने म्हणजे अपयश नव्हे, ती संधी आहे स्वतःला घडवण्याची.
✅ सकारात्मक दृष्टीकोन हाच यशाकडे जाणारा खरा मार्ग आहे.
✅ जर तुमच्याकडे चिकाटी आणि मेहनतीची तयारी असेल, तर कोणतीही स्वप्नं अपुरी राहणार नाहीत.
✅ स्वावलंबन हाच आत्मसन्मानाचा पाया आहे.
✅ वेळ अमूल्य आहे, ती वाया घालवू नका – तिचा सदुपयोग करा.
जयराम बानन यांची कहाणी आपल्याला सांगते की, कोणत्याही परिस्थितीतून वर येता येतं – गरज असते ती धैर्याची, स्वप्न पाहण्याची आणि त्यासाठी काम करण्याची. एक वेळ अशी होती की त्यांच्याकडे खाण्याचे पैसे नव्हते, आणि आज ते हजारो लोकांना रोजगार देणारे उद्योजक आहेत.
“जर १३ वर्षांचा मुलगा, डोळ्यांत मिरची घेऊन घरातून निघून जाऊन करोडोंचा साम्राज्य उभं करू शकतो, तर आपण का नाही?”