🗞️ जत शहरात दिवाळीनंतर कचरा गोळा करणाऱ्या गाड्या बंद झाल्याने शहरभर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. दुर्गंधी, आरोग्याचा धोका आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे जतकरांमध्ये संताप उसळला आहे. भावी नगरसेवक गप्प का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
जत,(प्रतिनिधी – आयर्विन टाइम्स, जत):
जत शहरात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे — ‘कचऱ्याचे ढीग आणि नगरपरिषदेचे मौन!’ दिवाळी संपून अवघे काही दिवस झाले असतानाच शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्लीबोळांत कचऱ्याचे ढीग साचून शहराचे रूप विद्रूप झाले आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, “स्वच्छ जत, सुंदर जत” या नगरपरिषदेच्या घोषणेला तडा गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

🏙️ ‘स्वच्छ जत’ मोहिमेचा बोजवारा
नगरपरिषदेकडून काही महिन्यांपूर्वीच ‘स्वच्छ जत, सुंदर जत’ ही मोहीम राबवण्यात आली होती.
त्याअंतर्गत प्रत्येक प्रभागात कचरा कुंड्या बसवण्यात आल्या होत्या. तसेच ‘येथेच कचरा टाका, अन्यथा दंड’ अशा इशाऱ्याचे डिजिटल बोर्ड ठिकठिकाणी लावण्यात आले होते. सुरुवातीला या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत होता.
परंतु आता परिस्थिती पूर्णपणे उलटली आहे. नगरपरिषदेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या मागील काही दिवसांपासून गायब आहेत. पूर्वी दिवसभर लाऊडस्पीकरवरून सूचना देत फिरणाऱ्या या गाड्यांचा आवाज बंद झाला असून, नागरिकांना कचरा टाकण्यासाठी जागा नाही.
🚛 कचरा गाड्या गायब – नागरिक हैराण
दिवाळीनंतर अचानकच नगरपरिषदेच्या कचरा उचलणाऱ्या गाड्या बंद झाल्याचे चित्र आहे.
कोणतीही पूर्वसूचना, जाहिरात किंवा दवंडी न देता या गाड्या बंद केल्याने जत शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग* साचले आहेत.
सांगली अर्बन बँकेसमोर, तेली गल्ली, ऐनापुरे मेडिकलसमोर, मल्लिकार्जुन इलेक्ट्रिक दुकानाजवळ, संभाजी चौक पुलाजवळ तसेच जुन्या स्टेट बँकेच्या मागे असलेल्या रस्त्यावर तर दुर्गंधीने नागरिकांचे हाल होत आहेत.
शहरातील माजी आमदार विक्रम सावंत आणि सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय (नाना) शिंदे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात सुद्धा कचरा साचल्याचे नागरिक सांगतात.

😷 आरोग्याचा गंभीर प्रश्न
साचलेल्या कचऱ्यामुळे माशा, डास आणि कीटक वाढत आहेत.
दुर्गंधीमुळे बाजारपेठेत आणि घरांच्या परिसरात श्वास घेणेसुद्धा कठीण झाले आहे.
नागरिक म्हणतात, “दिवाळी झाली, कचरा वाढला, पण उठाव थांबला — आता आमचं जगणंच दुर्गंधीने भरलं आहे.”
🗳️ भावी नगरसेवकांवर नागरिकांचा रोष
नगरपरिषदेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. इच्छुक उमेदवार प्रचाराच्या तयारीला लागले असले तरी शहरातील कचऱ्याच्या समस्येकडे कोणी लक्ष देत नाही.
“कचऱ्याचे ढीग डोळ्यांसमोर असूनही भावी नगरसेवक गप्प का?” असा संतप्त सवाल ज-तकरांनी उपस्थित केला आहे.
काही नागरिकांनी सोशल मीडियावर “कचरा हटवा, ज-त वाचवा” अशी मोहीम सुरू केली आहे.
तर काहींनी मुख्याधिकारी आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर ‘दुर्लक्ष आणि निष्क्रियतेचा आरोप’ केला आहे.

🧑💼 मुख्याधिकारी राठोड यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या प्रशासनाकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.
“दिवाळीनंतर शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत, तरीही मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत का?” असा प्रश्न ज-तकर विचारत आहेत.
नगरपरिषदेकडून अजूनही कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, नागरिकांनी जर ही स्थिती कायम राहिली तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दिवाळीच्या नंतरच्या ‘स्वच्छतेच्या गप्पा’ आता फक्त घोषणांपुरत्या उरल्या आहेत.
ज-त शहरातील कचऱ्याचा प्रश्न हा फक्त स्वच्छतेचा नव्हे, तर प्रशासनिक निष्क्रियतेचा प्रतीक बनला आहे.
आता नगरपरिषद व मुख्याधिकारी कोणती ठोस पावले उचलतात आणि भावी नगरसेवक नागरिकांसाठी खरोखर पुढे येतात का, याकडे ज-तकरांचे लक्ष लागले आहे.
