जत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार. सुरेश शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित.
जत,(आयर्विन टाइम्स प्रतिनिधी) :
जत नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळवत, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट — शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट — यांनी एकत्र येत घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
या एकत्रित आघाडीची औपचारिक घोषणा माजी आमदार विलासराव जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांनी जाहीर केले की, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सुरेश शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

🔸 दहशतवाद आणि गुंडगिरीविरुद्ध एकजूट
पत्रकार परिषदेत बोलताना माजी आ. विलासराव जगताप आणि उमेदवार सुरेश शिंदे म्हणाले,
“जत शहरातील दहशतवाद, गुंडगिरी आणि भ्रष्टाचार यांना आळा घालण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेच्या विकासासाठी आणि शांततेसाठी ही लढाई एकसंघपणे लढवली जाईल.”
🔸 २३ जागांवर ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार
या आघाडीच्या माध्यमातून जत नगरपरिषद निवडणुकीतील सर्व २३ जागांवर घड्याळ या चिन्हावर उमेदवार उभे राहणार आहेत. नगराध्यक्षपदासह सर्व प्रभागांमध्ये पक्षाची एकजूट कायम ठेवत एकमुखी रणनीती राबवली जाणार आहे.
🔸 स्थानिक नेत्यांचा आणि संघटनांचा पाठींबा
पत्रकार बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, माजी उपनगराध्यक्ष आप्पा पवार, माजी नगरसेवक स्वप्नील शिंदे, टिमू एडके, शशिकांत काळगी, शरणाप्पा आक्की, सोसायटी माजी अध्यक्ष प्रकाश देवकुळे, ब.स.पा. तालुकाध्यक्ष तानाजी व्हनखंडे, मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष राजू इनामदार, तसेच मकसूद नगारजी, प्रमोद सावंत, नसिर मुल्ला, बंदेनमाज पटाईत, लक्ष्मण कोडग, दिपक पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार आणि दलित महासंघाचे प्रकाश देवकुळे यांनी आघाडीला जाहीर पाठींबा दिला.
🔸 एकत्रित राष्ट्रवादीकडून दमदार लढत अपेक्षित
या निर्णयामुळे जत नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने निवडणुकीत नवे राजकीय चित्र निर्माण झाले आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटातील ऐक्यामुळे इतर पक्षांसाठी ही लढत अधिक आव्हानात्मक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
