सारांश: जत तालुक्यातील आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून चार ते पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संस्थेने मुख्याध्यापकावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली असून समाजकल्याण विभागाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गावात तणावाचे वातावरण आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
जत, (आयर्विन टाइम्स प्रतिनिधी):
जत तालुक्यातील एका नामांकित आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडून सातवी आणि आठवीमध्ये शिकणाऱ्या चार ते पाच अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी (ता. २४) ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शुक्रवारी दिवसभर समाजकल्याण व महिला बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित संस्थेची सखोल चौकशी केली.
संस्थेने तत्काळ मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई केली असून, याबाबतचा प्रस्ताव समाजकल्याण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्या मुख्याध्यापकाविरोधात अशाच स्वरुपाचे आरोप झाले होते. मात्र, तेव्हा कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार गोपीचंद पडळकर यांनी आश्रमशाळेस भेट दिली. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत दोषींवर कठोरात कठोर कारवाईचे निर्देश दिले. “पीडित मुलींना न्याय मिळालाच पाहिजे आणि कोणत्याही दोषी व्यक्तीला पाठीशी घालण्यात येऊ नये,” अशा स्पष्ट सूचना आमदार पडळकर यांनी दिल्या.
समाजकल्याण विभागाच्या अधिकारी धनश्री शंकरदास तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी व महिला बालविकास अधिकारी संदीप यादव यांनी सकाळपासूनच आश्रमशाळेत उपस्थित राहून सखोल चौकशी केली. संबंधित मुख्याध्यापक व इतर शिक्षकांची कसून चौकशी करण्यात आली. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शाळेबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
हेदेखील वाचा: crime news: दारूड्या बापाच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षांच्या मुलीने केला त्याचा खून
तासगावचे पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले यांनीही घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. लवकरच गुन्हा नोंदवून अधिकृत तपास सुरू केला जाणार आहे.
दरम्यान, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास सनमडीकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, “आमच्या संस्थेमध्ये घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. संस्था दोषी व्यक्तीला कोणतीही माफी देणार नाही. मुख्याध्यापकावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली असून, समाजकल्याण विभागाला याबाबत प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. प्रशासनाच्या चौकशीसाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू.”
या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यासह सांगली जिल्ह्यात संतापाचे आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे. पीडित मुलींना न्याय मिळावा आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी समाजातील विविध स्तरातून होत आहे.