कृत्रिम बुद्धिमत्तेचा- AI धोकादायक विस्तार

गेल्या तीन दशकांत इंटरनेटच्या झपाट्याने झालेल्या विस्ताराने संपूर्ण जगच बदलून टाकले आहे. अगदी काही दशकांपूर्वी जे अशक्य वाटत होते, ते आज आपल्या बोटांच्या टोकांवर उपलब्ध झाले आहे. स्मार्टफोनच्या माध्यमातून अख्खं जग आपल्या हातात सामावलं आहे. माहिती, मनोरंजन, व्यवसाय, शिक्षण, संवाद – या सर्व क्षेत्रांत इंटरनेटने क्रांती घडवून आणली.

मात्र या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा टप्पा गाठला तो २०२२ मध्ये, जेव्हा ‘चॅटजीपीटी’च्या रूपाने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सामान्य लोकांच्या वापरात आली. AI च्या सहाय्याने अनेक कामं आता काही क्षणांत होऊ लागली आहेत. लेखन, अनुवाद, चित्रनिर्मिती, कोडिंग, संगीत, व्हिडिओ निर्मिती अशा असंख्य सर्जनशील कामांमध्ये AI ने प्रवेश केला आहे. या बदलांमुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या असल्या, तरी त्याचे गंभीर परिणामही दिसू लागले आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा- AI धोकादायक विस्तार

सर्जनशीलतेवरचा आघात

AI च्या वापरामुळे जगभरात नोकऱ्यांवर गदा येऊ लागली आहे. विशेषतः सर्जनशील क्षेत्रांतील – लेखक, कलाकार, डिझायनर, पत्रकार, व्हिडिओ निर्माता यांच्यासाठी ही एक मोठी चिंतेची बाब आहे. युट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या मंचांवर AI च्या साहाय्याने तयार केलेली बनावट सामग्री प्रचंड प्रमाणात पोस्ट केली जात आहे. ही सामग्री केवळ मजकूरापुरती मर्यादित नाही. बनावट आवाज, चेहरा, बोलण्याची शैली यांच्या आधारे प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने बनावट व्हिडिओ तयार केला जात आहे. हे व्हिडिओ इतके खरे वाटतात की सामान्य वापरकर्त्याला त्यातील बनावटपणा कळणं कठीण होतं.

मौलिक कलाकार अडचणीत

ही नक्कलबाज सामग्री सोशल मीडियावर पैसे कमवण्यासाठी वापरली जात आहे. यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवणारे अनेकजण आहेत. पण त्यामुळे ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने, कल्पकतेने आणि वेळ खर्च करून मौलिक रचना निर्माण केली आहे, त्यांचं नुकसान होत आहे. या नवनवीन AI टूल्समुळे बनावट सामग्री इतक्या वेगाने तयार होते की, ती खऱ्या कलाकारांच्या कामाला गिळंकृत करते. लोकांना नेमकं कळतच नाही की काय खरी निर्मिती आहे आणि काय बनावट.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा- AI धोकादायक विस्तार

धोरणात्मक पावले आणि त्यामागचं दुटप्पीपण

या समस्येच्या पार्श्वभूमीवर युट्यूबने आणि मेटाच्या (फेसबुक-इन्स्टाग्राम) मंचांनी अलीकडे काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. युट्यूबने स्पष्ट केले आहे की अशा चॅनेल्सचे मोनेटायझेशन थांबवले जाईल, जिथे पूर्णपणे AI च्या सहाय्याने – कोणतीही मानवी मेहनत न घेता – सामग्री तयार केली जाते. पुनरावृत्तीची, नक्कल केलेली, नाविन्यविहीन सामग्री काढून टाकण्यात येईल. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसुद्धा बनावट फोटो आणि व्हिडिओ ओळखण्यासाठी AI आधारित साधनांचा वापर करत आहेत. यामुळे फसवणूक, दिशाभूल, आणि गैरवापर यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु एक प्रश्न असा आहे की, हीच तंत्रज्ञान कंपन्या – ज्यांनी AI चा प्रचार, विकास, प्रसार केला – त्या आजच ‘मौलिकतेच्या’ नावाखाली त्याच तंत्रज्ञानावर बंधनं आणत आहेत. याला दुटप्पी धोरणच म्हणावे लागेल.

हेदेखील वाचा: Environmental crisis: प्लास्टिक आणि ई-कचरा : इक्कविसाव्या शतकातील वाढते पर्यावरणीय संकट; दरवर्षी सुमारे 5 कोटी टन प्लास्टिक कचरा मिसळतो पर्यावरणात

बनावट सामग्रीचा स्फोट

AI आधारित टूल्समुळे बनावट सामग्रीचे प्रमाण इतके वाढले आहे की ती ओळखणेही अवघड झाले आहे. आज जगभरात दररोज लाखो बनावट फोटो, व्हिडिओ, लेख सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. या “कचऱ्यामुळे” खऱ्या आणि मौलिक सामग्रीचा आवाज दबला जातो आहे. हे दृश्य एखाद्या शहरातील सांडपाण्याच्या नाल्याप्रमाणे आहे – वाहतंय खूप काही, पण उपयोगाचं फारसं नाही. AI चा अतिरेक, त्यात असलेली गती आणि सुलभता, यामुळे माहितीचा विस्फोट झाला आहे. मात्र, त्या माहितीचा दर्जा, उपयोगिता आणि सत्यता याबाबत शंका निर्माण झाली आहे.

AI विरुद्ध AI: लढा सुरु

एक महत्त्वाची बाब म्हणजे, या बनावट सामग्रीचा सामना करण्यासाठीही AI चाच वापर करण्यात येतो आहे. कारण, इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या सामग्रीचं विश्लेषण आणि परीक्षण माणसांच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे. मात्र येथेच एक धोका आहे – AI आधारित नियम चुकीच्या सामग्रीवर बंधन घालण्याऐवजी, कधी कधी खऱ्याच रचनांनाही रोखू शकतात. त्यामुळे “फिल्टर” लावणाऱ्या प्रणालींमध्ये पारदर्शकता, मानवी हस्तक्षेप आणि विवेकशील मूल्यांकन गरजेचं आहे. केवळ मशीनवर विश्वास ठेवून सर्जनशीलतेचं भवितव्य ठरवणं धोकादायक ठरू शकतं.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा- AI धोकादायक विस्तार

सर्जनशीलतेसाठी सन्मान आणि संरक्षण आवश्यक

या संपूर्ण घडामोडीमधून जे स्पष्टपणे दिसत आहे, ते म्हणजे – सर्जनशीलतेसाठी सन्मान आणि संरक्षण यांची गरज आहे. AI चा वापर उपयुक्त ठरू शकतो, पण तो सर्जकांच्या हक्कांवर गदा आणणारा ठरू नये. सर्जनशील काम हे केवळ उत्पादन नव्हे, तर ते एका व्यक्तीच्या विचारांचा, भावनांचा आणि अनुभवांचा परिपाक असतो. त्यामुळे त्याला “तंत्रज्ञानाने सहज नक्कल करता येईल” अशी दृष्टी ठेवल्यास, मानवतेचा सांस्कृतिक पायाच हादरेल.

पुढचा मार्ग — संमिश्र मॉडेलची गरज

या समस्येवर उपाय शोधताना केवळ यंत्रांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही. यंत्र आणि माणूस यांच्यात संतुलन राखणारे संमिश्र मॉडेल आवश्यक आहे. AI चा योग्य वापर करताना मानवी हस्तक्षेप, तांत्रिक पारदर्शकता आणि नीतिमूल्यांची जाणीव राखली पाहिजे. जेणेकरून बनावट आणि खऱ्यामधील सीमारेषा स्पष्ट राहील आणि खऱ्या सर्जनशीलतेला मान मिळेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही शंकास्पद नाही, पण तिचा अतिरेकी आणि बिनधास्त वापर नक्कीच चिंताजनक आहे. आज आपण एका अशा टप्प्यावर आहोत, जिथे प्रत्येक सर्जकाला, प्रत्येक वाचकाला आणि प्रत्येक तंत्रज्ञान कंपनीला विचार करावा लागेल — की आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत? जर या वेळी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पावले उचलली गेली, तर सर्जनशीलतेचे रक्षण करता येईल. अन्यथा, या ‘कृत्रिम कचऱ्याच्या’ गर्दीत खरे आणि मौलिक निर्माण कायमचे हरवून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *