मे महिना सुरू झाला की मॉन्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते; याला वळीव पाऊस असेही म्हणतात. जोराचा वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस येतो.
अशावेळी निसर्गापुढे अतिशहाणा करून चालत नाही, अन्यथा मृत्यूशी गाठ पडते. अवकाळी पावसाबरोबर कोसळणारी वीज आणि ढगांच्या गडगडाटापासून दूर राहणे गरजेचे आहे.
भारत सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तसे नियमही घालून माहिती दिली आहे. अशी खबरदारी घेणे आवश्यक...
■ विजांचा कडकडाट सुरू असताना घराबाहेर पडू नका. घराबाहेर असाल तर सुरक्षित ठिकाणी थांबा. उंच जागेवर जाणे टाळा.
■ विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका. घरात असाल तर दारे-खिडक्या बंद करा. ■ गाडीत असल्यास काचा बंद ठेवा.
■ चार-पाच जण एकत्र असाल तर प्रत्येकामध्ये सुरक्षित अंतर ठेवा. मोबाईल फोनचा वापर टाळा.■ वीज कोसळलेल्या व्यक्तीला स्पर्श केला तरी काही धोका नसतो.
■ विजा चमकत असताना कुठल्याही ठिकाणी पोहणे धोकादायक असते. एखाद्या व्यक्तीवर वीज कोसळली तर तातडीने प्रथमोपचारासाठी प्रयत्न करा.
■ वीज कोसळून संकटात सापडलेल्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास सुरळीत आहे का, हे सावधगिरीने तपासा. ■ त्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास बंद पडला असेल तर तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वासोच्छ्वास द्या.
■ अशावेळी घाबरून न जाता आपत्कालीन सेवा देणाऱ्या १०७८ या क्रमांकावर संपर्क साधून तुमच्यापर्यंत पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या.